Monday, June 1, 2026

Air India : कलिनातील एअर इंडिया वसाहत अखेर रिकामी

Air India : कलिनातील एअर इंडिया वसाहत अखेर रिकामी

मुंबई : कलिना येथील १८४ एकर विस्तीर्ण परिसरात पसरलेली एअर इंडियाची ऐतिहासिक कर्मचारी वसाहत (स्टाफ कॉलनी) अखेर पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या मालकीच्या १०६ इमारतींमधील तब्बल १,६८३ घरांची ही जमीन आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांत, तेथे वास्तव्यास असलेल्या उर्वरित १५० रहिवाशांनीही जड अंतःकरणाने आपली घरे रिकामी केली.

एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांसाठी १९५५ मध्ये पहिली वसाहत उभारण्यात आली होती. त्यानंतर १९८० च्या दशकात आणखी तीन वसाहतींची भर पडली. २०२२ मध्ये एअर इंडियाचे खासगीकरण झाल्यानंतर, कर्मचारी आणि कामगार संघटनांनी आपल्या हक्काच्या निवासस्थानासाठी तब्बल चार वर्षे न्यायालयीन लढा दिला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कर्मचाऱ्यांच्या विरोधात गेल्यानंतर सुरुवातीला ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ नये म्हणून रहिवाशांच्या विनंतीनुसार 'मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड' ने ही मुदत ३१ मे २०२६ पर्यंत वाढवून दिली होती. ती मुदत संपताच ही ऐतिहासिक वसाहत आता इतिहासजमा झाली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंची खाण!

कलिना वसाहत केवळ एक निवासी परिसर नव्हती, तर ती मुंबई आणि देशाच्या क्रीडा विश्वाचे एक मोठे केंद्र होती. येथील मैदानांवर मुंबई क्रिकेट असोसिएशन ची प्रशिक्षण शिबिरे आणि बीसीसीआयच्या महिला संघाची सराव सत्रे रंगायची. भारताचे आघाडीचे क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे याच मैदानावर सराव करून घडले आहेत. तसेच, येथील फुटबॉल मैदानावरून अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहोचले.

शाळा सुरू राहणार

वसाहतीतील दोन शासकीय अनुदानित शाळांमध्ये सुमारे ३ हजार विद्यार्थी शिकत आहेत. या शाळांना अद्याप जागा रिकामी करण्याची नोटीस मिळालेली नसल्याने त्या सध्या सुरूच राहणार आहेत.

संकटकाळात धावून जाणारे देवदूत!

या वसाहतीमधील रहिवाशांनी मुंबईवर आलेल्या अनेक संकटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जुलै २०१८ च्या पुरादरम्यान संपूर्ण शहर ठप्प होते. एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरले होते. त्यावेळी कलिनाचे अभियंते चालत विमानतळावर गेले होते. २०२० मध्ये करोना काळात पीपीई किट-औषधे घेऊन आंतरराष्ट्रीय मालवाहू विमाने विमानतळावर उतरली, तेव्हा लोडर, मजूर, इंजिनिअर यांच्यासह कॉलनीतील रहिवाशांनी विमानतळापर्यंतचा १० मिनिटांचा रस्ता चालत जाऊन स्वतःच मालवाहू विमानांतील माल उतरवला होता, असे एअर इंडिया स्टाफ कॉलनी ग्राहक सहकारी संस्थेचे अध्यक्ष एम. पी. देसाई यांनी सांगितले.

Comments
Add Comment