Sunday, May 31, 2026

IPL 2026 Final : फायनलपूर्वी गुजरात टायटन्सला मोठा झटका! हवामानामुळे अहमदाबादला पोहोचण्यात उशीर

IPL 2026 Final : फायनलपूर्वी गुजरात टायटन्सला मोठा झटका! हवामानामुळे अहमदाबादला पोहोचण्यात उशीर
अहमदाबाद (IPL 2026 Final) : आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या अंतिम सामन्याला अवघे काही तास शिल्लक असताना शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) संघाला अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागला आहे. वादळी हवामान आणि पावसामुळे संघाच्या प्रवासावर परिणाम झाला असून, शनिवारी दुपारपर्यंतही गुजरात टायटन्सचा संघ अंतिम सामन्याच्या ठिकाणी म्हणजेच अहमदाबादमध्ये पोहोचू शकला नव्हता. रविवारी, ३१ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात आयपीएल 2026 चा बहुचर्चित अंतिम सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच गुजरातच्या संघाची धावपळ सुरू झाल्याने संघ व्यवस्थापनासह चाहत्यांचीही चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनल खेळणाऱ्या संघाला अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी प्रवास करण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे.
IPL इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारतात निर्माण झालेल्या खराब हवामानामुळे गुजरात टायटन्सच्या (GT) चार्टर विमानाला वेळेत उड्डाणाची परवानगी मिळू शकली नाही. त्यामुळे संघाचा संपूर्ण प्रवास विस्कळीत झाला. विविध अहवालांनुसार, गुजरात टायटन्सचा ताफा शनिवारी रात्री 10 नंतरच अहमदाबादमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कधीही फायनल खेळणाऱ्या संघावर अशी वेळ आली नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वी क्वालिफायर-२ (Qualifier-2) आणि अंतिम सामना एकाच शहरात किंवा एकाच मैदानावर आयोजित केला जात असे. त्यामुळे अंतिम फेरी गाठणाऱ्या संघाला अतिरिक्त प्रवास करावा लागत नव्हता. मात्र यंदा स्पर्धेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलामुळे गुजरात टायटन्सला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
क्वालिफायर-२ नंतर GT ची धावपळ गुजरात टायटन्सने क्वालिफायर-२ सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर मैदानावर खेळवण्यात आला होता. नियोजनानुसार संघाने अंतिम सामन्याच्या तयारीसाठी किमान एक दिवस आधी अहमदाबादमध्ये पोहोचणे अपेक्षित होते. मात्र हवामानामुळे ते शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत प्रवासाचा थकवा, सरावासाठी कमी मिळालेला वेळ आणि अंतिम सामन्यापूर्वीची धावपळ याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता क्रिकेट तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अंतिम सामना जिंकण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे GT साठी ही परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते. RCB ला मिळू शकतो मोठा फायदा दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर-१ (Qualifier-1) मध्ये गुजरात टायटन्सचाच पराभव करत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे RCB ला अधिक विश्रांती आणि तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला. संघ अंतिम सामन्याच्या ठिकाणी आधीच पोहोचल्याने खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेण्याची संधी मिळाली आहे. यामुळे आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी RCB तुलनेने अधिक निवांत आणि तयार दिसत असताना, गुजरात टायटन्सला शेवटच्या क्षणी प्रवास आणि हवामानाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता या परिस्थितीचा अंतिम सामन्याच्या निकालावर किती परिणाम होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment