Friday, July 31, 2026

CWG 2026 : ग्लासगो येथे ऐतिहासिक कामगिरी; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सीमा कलिरामानाने पटकावले कांस्य पदक

CWG 2026 : ग्लासगो येथे ऐतिहासिक कामगिरी; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सीमा कलिरामानाने पटकावले कांस्य पदक

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताच्या २७ वर्षीय सीमा कलिरामाना हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्य पदक आपल्या नावावर केले आहे. विशेष म्हणजे, एका तीन वर्षांच्या मुलाची आई आणि शारीरिक शिक्षणामध्ये पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या सीमाने आपल्या जिद्दीच्या जोरावर हा ऐतिहासिक पराक्रम करून दाखवला आहे.

मुलाला जन्म दिल्यानंतर काही कालावधीसाठी खेळापासून दूर राहिलेल्या सीमाने गेल्या वर्षी राष्ट्रीय खेळांमध्ये यशस्वी पुनरागमन केले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील एखाद्या मोठ्या स्पर्धेत तिने मिळवलेले हे पहिलेच पदक आहे. या विजयामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारताच्या एकूण पदकांची संख्या आता १७ वर पोहोचली असून, पदक तालिकेत भारत १० व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

अशी राहिली अंतिम फेरीतील कामगिरी या स्पर्धेची सुरुवात सीमासाठी फारशी चांगली झाली नाही. तिचा पहिला थ्रो गोळाफेकीच्या जागेच्या चौकटीला लागल्याने अपयशी ठरला. मात्र, खचून न जाता सीमाने दुसऱ्या प्रयत्नात जबरदस्त पुनरागमन केले आणि ५७.३२ मीटर लांब थ्रो करत थेट तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात आणखी सुधारणा करत तिने ५८.६५ मीटरचा सर्वोत्तम थ्रो नोंदवला आणि कांस्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत जमैकाच्या सामंथा हॉलने ६१.६६ मीटर लांब थ्रोसह सुवर्णपदक पटकावले, तर कॅनडाच्या ज्युलिया टंक्सने ६०.६७ मीटर थ्रो करून रौप्य पदक मिळवले.

पदक जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना सीमा कलिरामाना यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले, "राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. येथील तीव्र थंडीमुळे मला वारंवार वॉर्म-अप करावे लागत होते. खेळासोबतच मी चौधरी बन्सीलाल विद्यापीठातून पीएचडी करत असून माझे मार्गदर्शक डॉ. सुरेश कुमार मलिक यांचे मला मोलाचे सहकार्य लाभले आहे."

कठोर परिश्रम, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उच्च शिक्षणाचा ताळमेळ साधत सीमा कलिरामानाने मिळवलेले हे यश भारताच्या प्रत्येक क्रीडाप्रेमीसाठी अभिमानास्पद ठरले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >