Saturday, May 30, 2026

Nashik : नाशिककरांचा मुंबई, पुणे, हैदराबाद प्रवास आता अवघ्या दोन तासांत होणार, पण कसा ? महापालिकेचा प्रस्ताव काय ?

Nashik : नाशिककरांचा मुंबई, पुणे, हैदराबाद प्रवास आता अवघ्या दोन तासांत होणार, पण कसा ? महापालिकेचा प्रस्ताव काय ?

नाशिक : जपान सरकारच्या सहकार्याने सुरू असलेल्या अहमदाबाद-मुंबई-पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाला आता नाशिक फिडर कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे नाशिककरांना मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही शहरे अवघ्या दीड ते दोन तासांत गाठता येणार असून ‘ठाणे-पुणे-नाशिक’ असा नवा आर्थिक सुवर्ण त्रिकोण आकारास येणार आहे.

जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान (एएफजे) यांच्या पुढाकाराने महापालिका मुख्यालयात उच्चस्तरीय जपानी सल्लागार टीमची बैठक झाली. प्रभारी आयुक्त अमित रंजन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत नाशिकला अहमदाबाद-मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाशी जोडण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. केंद्र सरकारकडून पूर्वी मंजूर असलेला नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग रखडल्यानंतर आता जपानच्या पुढाकाराने या प्रकल्पाला नवी गती मिळणार आहे.

बुलेट ट्रेनशी नाशिकचा थेट संपर्क वाढल्यास शहराच्या विकासाला मोठी गती मिळेल. कृषी पुरक आणि वाईन उद्योगालाही चालना मिळून नाशिकची अर्थव्यवस्था बळकट होईल, असा विश्वास नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रंजन यांनी व्यक्त केला.

असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान’ या संस्थेचे अध्यक्ष समीर खाळे आणि मुख्य समन्वयक अजय देशपांडे, जपानचे काझुकी योशिओका, सेईइचिरो अकिमुरा, कोजी यामादा, मोतोनोबू शिबुया, नाओतो टाकुमा, तोशिको सायटी, रयोको नाकानो, योइची हरादा, यासुओ इझुमी, तोमोमी सायटो, किनुको मितानी आणि ताकाहिरो मितानी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >