Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरात गोवंश तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई; ४४ आरोपींना अटक!

छत्रपती संभाजीनगर : गोवंश तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई करत तस्करांचे कंबरडे मोडले आहे. चोरट्या मार्गाने गोवंशाची अवैध वाहतूक करणारे, बेकायदेशीर कत्तलखाने चालवणारे आणि गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठं जाळं उद्ध्वस्त केलं आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या आदेशानंतर संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी आक्रमक मोहीम उघडली असून, अनेक मोठे तस्कर भूमिगत झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली आहे.



RTO चा मोठा दणका; वाहन आणि लायसन्सवर थेट कारवाई


गोवंश तस्करी प्रकरणात केवळ गुन्हे दाखल करून पोलीस थांबले नाहीत, तर तस्करांच्या आर्थिक नाड्यांवरही थेट घाव घालण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी तब्बल १९ वाहनं आणि चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर तत्काळ कारवाई करत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ५ वाहनांचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित केले आहेत. तसेच ६ चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) थेट ९० दिवसांसाठी रद्द (Cancel) करण्यात आले आहेत. याशिवाय इतर जिल्ह्यांतील वाहनांवरही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित आरटीओ (RTO) कार्यालयांकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. भविष्यात गोवंश तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.


१० दिवसांत २४ गुन्हे दाखल; ४४ आरोपी जेरबंद


१६ मे ते २६ मे या अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली. छुप्या मार्गांवर नाकाबंदी, रात्रीची गस्त आणि सुनियोजित छापेमारी करत पोलिसांनी गोवंश तस्करांना जेरबंद केले. वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री आणि करमाडसह अनेक पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी या मोहिमेत धाडसी कामगिरी बजावली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २४ गंभीर गुन्हे दाखल केले असून तब्बल ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम, भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन अधिनियमांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.



१११ जनावरांची सुटका; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त


पोलिसांनी छापेमारीदरम्यान कत्तलीसाठी अत्यंत निर्दयीपणे डांबून ठेवलेली १११ जनावरे सुखरूप मुक्त केली आहेत. यामध्ये छुप्या ठिकाणी ठेवलेली ४२ जनावरे आणि वाहनांमध्ये कोंबून नेण्यात येत असलेली ६९ जनावरे यांचा समावेश आहे. या सर्व जनावरांची किंमत तब्बल ३३ लाख ९९ हजार २०० रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. मुक्त करण्यात आलेल्या जनावरांना अधिकृत गोशाळांमध्ये पाठवण्यात आले आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपींकडून १ हजार ९४५ किलो गोमांस, वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ५५ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांचं नागरिकांना आवाहन


या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. गोवंशाची अवैध वाहतूक, तस्करी किंवा बेकायदेशीर कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष (0240-2381633) किंवा ‘डायल 112’ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि गोवंश तस्करांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Mangalwedha Reel Star Ends Life : सोशल मीडियावरील प्रसिद्ध रीलस्टारची हॉटेलच्या स्वयंपाकघरात आत्महत्या; मंगळवेढ्यात खळबळ

मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Beed Crime : बीडमधील धक्कादायक प्रकार! अत्याचार पीडित चिमुरडीला रुग्णालयात १० तास बसवून ठेवलं; संतापजनक घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बीड : बीड जिल्हा सध्या गुन्हेगारीच्या विळख्यात सापडला आहे. गुन्हेगारीचा हा आलेख वाढत असतानाच, आता जिल्ह्यातील

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा