Thursday, May 28, 2026

Women's World Cup : महिला विश्वचषकापूर्वी भारताचा अंतिम सराव !

Women's World Cup : महिला विश्वचषकापूर्वी भारताचा अंतिम सराव !

लंडन (वृत्तसंस्था) :

पुढील महिन्यात (१२ जून) सुरू होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ आपली अंतिम तयारी करण्यासाठी सज्ज झाला आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ आपले सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन शोधण्याचा आणि कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी ही मालिका विश्वचषकाचा 'अंतिम सराव' ठरणार आहे.

गेल्या वर्षभरात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरीचे काही अप्रतिम नमुने दाखवले असले, तरी कामगिरीत सातत्य राखणे हे संघापुढील मोठे आव्हान राहिले आहे. भारताची विश्वचषक पूर्वतयारी संमिश्र राहिली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये भारताने श्रीलंकेला घरच्या मैदानावर ५-० असे नमवले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर १ दशकानंतर पहिली द्विपक्षीय मालिका २-१ अशी जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र, नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताला १-४ असा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे फलंदाजीतील सातत्य आणि मधल्या फळीतील कमकुवतपणा उघडा पडला.

दरम्यान १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारताला गोलंदाजीची बाजू भक्कम करावी लागेल. रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड आणि अरुंधती रेड्डी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. तसेच, महिला प्रीमियर लीगमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित करणाऱ्या नवोदित नंदिनी शर्माला या मालिकेत पदार्पणाची संधी मिळू शकते. भारतीय संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे यष्टिरक्षक यास्तिका भाटिया (दुखापतीनंतर) आणि फिरकीपटू राधा यादव यांचे संघात पुनरागमन झाले आहे. राधाच्या येण्याने दीप्ती शर्मा, श्री चराणी आणि श्रेयंका पाटील यांच्यासोबत फिरकी विभाग अधिक मजबूत झाला आहे.

Comments
Add Comment