Tuesday, May 26, 2026

Deool Band 2 Box Office Collection : 'देऊळ बंद २'ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; प्रवीण तरडेंचा सिनेमा सुपरहिटच्या दिशेने, सर्व थिएटरमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा गजर!

Deool Band 2 Box Office Collection : 'देऊळ बंद २'ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; प्रवीण तरडेंचा सिनेमा सुपरहिटच्या दिशेने, सर्व थिएटरमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा गजर!

मुंबई : प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित बहुचर्चित मराठी चित्रपट 'देऊळ बंद २'(Deool Band 2) २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार कामगिरी करत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती आणि आता ती कमाईच्या आकड्यांमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्यभरातील अनेक थिएटरमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल (Housefull) होत असून पहाटेच्या शोलादेखील प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत कोट्यवधी रुपयांची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'देऊळ बंद २'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच मजबूत सुरुवात केली. चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ३.११ कोटी, तर तिसऱ्या दिवशी तब्बल ५.२१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चौथ्या दिवशीही चित्रपटाची कमाई वाढली आणि ५.९० कोटी रुपयांचे कलेक्शन नोंदवण्यात आले.

यानंतर पाचव्या दिवशी चित्रपटाने ३.४० कोटी रुपयांची कमाई केली. तर सहाव्या दिवशी म्हणजेच २६ मे रोजी 'देऊळ बंद २'च्या खात्यात आणखी ३.३५ कोटी रुपयांची भर पडली. वीकेंडनंतर कमाईत काहीशी घसरण दिसून आली असली तरी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील (Box Office) दबदबा कायम असल्याचे दिसत आहे.

'राजा शिवाजी'च्या सहाव्या दिवसाच्या कमाईलाही टाकलं मागे

'देऊळ बंद २'च्या सहाव्या दिवसाच्या कमाईने आणखी एक महत्त्वाचा विक्रम नोंदवला आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनित आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी सुमारे ३ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र 'देऊळ बंद २'ने सहाव्या दिवशी ३.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत 'राजा शिवाजी'च्या सहाव्या दिवसाच्या कमाईलाही मागे टाकले आहे. यामुळे आगामी दिवसांमध्ये 'देऊळ बंद २' आणखी किती कोटींची कमाई करतो आणि बॉक्स ऑफिसवर कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो, याकडे चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांचेही लक्ष लागले आहे.

'देऊळ बंद २' चित्रपटाची कथा आणि कलाकार

'देऊळ बंद २'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत स्नेहल तरडे (Snehal Tarde) यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटात शेतकऱ्यांच्या समस्या, आत्महत्या, निकृष्ट दर्जाचे बी-बियाणे, खतं आणि कीटकनाशकांमुळे होणारे नुकसान, तसेच सरकारी यंत्रणेकडून होणारा शेतकऱ्यांचा छळ यांसारख्या गंभीर आणि वास्तववादी विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. सामाजिक आशय आणि प्रभावी कथानकामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ग्रामीण भागापासून शहरी प्रेक्षकांपर्यंत सर्व स्तरांतून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'देऊळ बंद ३'ची उत्सुकता शिगेला (Deool Band 3)

'देऊळ बंद २'च्या शेवटी 'देऊळ बंद'चित्रपटातील राघव शास्त्री (Raghav Shastri) या पात्राची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे कथानक पुढे कोणत्या दिशेने जाणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. या शेवटामुळे आता संभाव्य 'देऊळ बंद ३' चित्रपटाबाबत चर्चांना उधाण आले असून चाहत्यांमध्ये पुढील भागाविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >