Tuesday, May 26, 2026

NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरे यांच्यात खडाजंगी

NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरे यांच्यात खडाजंगी

प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही गैरहजर; पार्थ पवार यांनीही बैठकीतून घेतला काढता पाय

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील धुसफूस पूर्णपणे चव्हाट्यावर आली असून, पक्षात काहीही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी मंगळवारी आयोजित पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात खडाजंगी झाली. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे मुंबईत उपस्थित असूनही या बैठकीला गैरहजर राहिले, तर भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अजित पवारांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकांकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची फळी कमालीची नाराज असून, या बैठकीतील वादामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली. "माझ्यावर, प्रफुल्ल पटेल यांच्यावर आणि पक्षावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा नेतृत्व आमच्या समर्थनासाठी पुढे येत नाही. अजितदादांच्या निधनानंतर आम्ही दोघेच पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहोत, मग प्रत्येक वेळी आम्हीच टिकेचे धनी का?" असा उद्विग्न सवाल तटकरे यांनी भर बैठकीत उपस्थित केला.

सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी तीव्र आक्षेप घेतला. "जे झाले ते झाले, ते विषय आता सोडून द्या आणि आपण सगळे मिळून पुढे जाऊया," असा सल्ला भुजबळांनी तटकरेंना दिला. मात्र, यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संवाद न रंगाता भर बैठकीतच जोरदार खडाजंगी झाली. विशेष म्हणजे, तटकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी तडकाफडकी बैठकीतून काढता पाय घेतल्याने उपस्थित आमदारांच्या भुवया उंचावल्या.

आमदारांमध्ये चलबिचलता

प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असूनही आणि मुंबईत हजर असूनही या महत्त्वपूर्ण बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरून पक्षात संभ्रम निर्माण झाला आहे. अजितदादांनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व गेले असले तरी, पक्षातील वरिष्ठ नेत्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये आणि आमदारांमध्ये निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment