Nashik Crime : अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime News: नाशिकचे भोंदू अशोक खरात प्रकरण हे देशभर चर्चेत आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक अशा विविध गुन्ह्यांमध्ये भोंदू खरातच्या न्यायालयीन कोठडी , पोलीस कोठडी अशा वाऱ्या चालू आहेत. दरम्यान नाशिकमध्ये आणखी भोंदूबाबा समोर आला असून या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) आश्रम आणि मठ स्थापन करून, विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांचे शोषण करणाऱ्या कमलेश शिवकुमार अधिकारी (Kamlesh Shivkumar Adhikari) आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.



नेमके प्रकरण काय ?


सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील लऊळ येथील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर या दोन पीडित भावांच्या आई-वडिलांचे २०२१ मध्ये अवघ्या एका महिन्याच्या अंतराने निधन झाले होते. आई वडिलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे दोन्ही भाऊ मानसिक तणावाखाली होते. जो सोबतच एकाच अचानक घडलेल्या घटनेनं भीतीच्या छायेत होते. यावर काहीतरी आध्यात्मिक किंवा दैवी तोडगा मिळावा म्हणून त्यांनी शोध सुरू केला. यादरम्यान त्यांना यूट्यूबवर नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील भोंदूबाबा कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली.



अन दोन्ही भावांनी नाशिक गाठले


दोन्ही भावांनी नाशिक गाठून कमलेश अधिकारीची भेट घेतली. तणावाखाली असलेल्या दोन्ही भावांच्या भोळेपणाचा आणि भीतीचा फायदा घेत भोंदूबाबानं त्यांच्या मनाचा ताबा मिळवला. "तुमच्या कुटुंबाचे मागच्या जन्मीचे पाप आहे, तुम्ही राहत असलेल्या जमिनीत दैवी दोष आहे. तिथे गुप्तधनाचा साठा असून अतृप्त आत्म्यांनीच तुमच्या आई-वडिलांचा बळी घेतला आहे. आता तुम्हा दोघांवरही मृत्यूयोग आहे," अशी भीती देवकर बंधूंना त्याने दाखवली.



जळत्या चितेवर चार दिवस अघोरी पूजा


यानंतर भोंदूबाबानं त्यांना मध्यप्रदेशातील उज्जैन (Ujjain) येथे बोलावून घेतले. तिथल्या स्मशानभूमीत जळत्या चितेवर चार दिवस अघोरी पूजा करण्यात आली. या पूजेदरम्यान पशूंचा बळी देण्यात आला आणि या नावाखाली 1 लाख 50 हजार रुपये उकळले. त्यानंतर नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमात पुन्हा अघोरी पूजा करून प्राण्यांचा बळी देण्यात आला आणि पीडितांना दारू प्रसाद म्हणून देण्यात आली.



जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम


एवढ्यावरच न थांबता या भोंदूबाबानं दोन्ही भावांना त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील आश्रमात बळजबरीने डांबून ठेवले. त्यांच्याकडून घरगुती कामे करून घेत त्यांचे विविध प्रकारे शोषण केले. तसेच स्वतःचा मठ बांधण्याच्या बहाण्याने त्यांची दोन एकर शेतजमीन फसवणूक करून परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतली. या संपूर्ण गुन्ह्यात भोंदूबाबा कमलेश अधिकारी याला त्याची पत्नी देखील मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.



शेवटी मदतीला अंनिस पुढे आले


या जाचाला कंटाळून सोलापूरच्या या दोन पीडित भावांनी अखेर नाशिक येथील अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पीडितांना धीर देत इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी भोंदू कमलेश अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास (Investigation) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करत आहेत. या भोंदूबाबानं अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी थेट अंनिस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Commonwealth Games 2026 Raja Muthupandi : कॉमनवेल्थमध्ये भारताचा दबदबा; गंभीर दुखापतीनंतर राजा मुथुपंडीने जिंकले रौप्यपदक

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ (Commonwealth Games 2026) मध्ये भारताच्या वेटलिफ्टिंग संघाने (Weightlifting) दमदार कामगिरी कायम ठेवत आणखी एक

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली