Sunday, May 24, 2026

Air India : एअर इंडिया मुंबईहून देशांतर्गत उड्डाणे कमी करणार, २८० साप्ताहिक उड्डाणे करणार रद्द

Air India : एअर इंडिया मुंबईहून देशांतर्गत उड्डाणे कमी करणार, २८० साप्ताहिक उड्डाणे करणार रद्द

मुंबई : एअर इंडिया १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत मुंबईहून २८० साप्ताहिक देशांतर्गत उड्डाणे कमी करणार. ही कंपनीकडून देशांतर्गत क्षमतेत केलेली पहिली मोठी कपात आहे. याआधीच कंपनीने आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्येही कपात केली होती. सुधारित वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर झाले नाही. या निर्णयाबाबत एअर इंडियाकडे ई-मेलद्वारे प्रतिक्रिया मागवण्यात आली, मात्र बातमी छापेपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नव्हता.

सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा समूहाच्या मालकीची ही विमान कंपनी मुंबईहून अनेक महत्त्वाच्या महानगर आणि प्रमुख मार्गांवरील उड्डाणांची वारंवारता कमी करणार आहे. यामध्ये दिल्ली मार्गावर सर्वाधिक परिणाम होणार असून ५० साप्ताहिक उड्डाणे कमी केली जाणार आहे. तरीही या मार्गावर जवळपास ३०० साप्ताहिक सेवा सुरू राहतील. अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या मार्गांवर प्रत्येकी सुमारे २१ साप्ताहिक उड्डाणे कमी केली जाणार आहे. तसेच व्यवसायिक प्रवासासाठी महत्त्वाचा असलेल्या बेंगळुरू मार्गावरही २१ उड्डाणांची कपात होणार असून एकूण वारंवारता ७०च्या खाली येईल. याशिवाय मुंबईहून नागपूर, वाराणसी, पाटणा आणि भोपाळ या शहरांसाठीची उड्डाणे या दोन महिन्यांसाठी तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. ही कपात मागील वर्षाच्या तुलनेत थोडी अधिक आहे. मुंबई एअर इंडियासाठी एक महत्त्वाचे देशांतर्गत हब असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हा निर्णय वाढलेले विमान इंधन दर, वाढती ऑपरेशनल खर्चाची दडपण आणि पावसाळ्यातील तुलनेने कमी प्रवासी मागणी यामुळे घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment