Saturday, June 13, 2026

Yeola : येवला तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळासह गारांचा पाऊस, कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

Yeola : येवला तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळासह गारांचा पाऊस, कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

येवला : येवला तालुक्यात निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नाहीय. सलग तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार थैमान घातले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन तालुक्याच्या पूर्व भागातील रेंडाळ्यासह संपूर्ण परिसरात वादळी वारे आणि गारांच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. आधीच बाजारभाव नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे या गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले असून बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. परिसरात झालेल्या गारांच्या माऱ्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने जोपासलेले कांदा बियाणे (डोंगळे) पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगामासाठी लागवडीचे बियाणे उपलब्ध कसे करायचे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सलगच्या या निसर्गाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान राज्यात कुठे उष्णतेने तर कुठे पावसाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. विदर्भात सुर्य आग ओकत आहे. ब्रह्यपुरीमध्ये यंदा राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्यपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात आजही उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला. मागील दोन दिवसांपासून या तिन्ही जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. सोलापूर, धाराशिव, लातूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. काल पुणे, पिंपरी चिंचवड या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Comments
Add Comment