Saturday, May 23, 2026

विधान परिषदेचा जागावाटपाचा तिढा सुटेना

विधान परिषदेचा जागावाटपाचा तिढा सुटेना

 रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

मुंबई : विधान परिषदेच्या १६ रिक्त जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी जाहीर झालेल्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये निर्माण झालेला जागावाटपाचा तीढा आद्यप सुटण्याची चिन्हे नाहीत. भाजपने १२ जागांवर दावा ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) १ आणि शिवसेनेला ४ जागांची ऑफर दिली आहे. मात्र, या फॉर्म्युलाला शिवसेनेने नकार दिला असून, आपल्याला किमान ७ जागा मिळाव्यात, या मागणीवर ते ठाम आहेत. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे, पालघर, नाशिक, कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), जळगाव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि हिंगोली या मतदारसंघांवर दावा केला आहे. यातील किमान ६ जागा तरी पदरात पडल्याच पाहिजेत, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला आहे. मात्र, भाजप सध्यातरी केवळ ४ जागा देण्यावरच ठाम आहे. महायुतीमधील या मतभेदामुळे शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट 'स्वबळा'वर लढण्याचा आग्रह वरिष्ठांकडे धरला आहे. तथापि, संभाव्य राजकीय नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व युती टिकवून तोडगा काढण्याच्या बाजूने आहे.

कोकणच्या जागेवरून चुरस

जागावाटपात काही जागांची अदलाबदली होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असली, तरी 'रायगड'च्या जागेवरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांनी दावा केला आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या मुलाला राजकीय संधी देण्यासाठी ही जागा शिवसेनेला सुटावी म्हणून सर्व ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दुसरीकडे, उबाठा गटातून शिवसेनेत प्रवेश केलेले राजापूरचे ज्येष्ठ नेते राजन साळवी या निवडणुकीच्या निमित्ताने कमालीचे सक्रिय झाले आहेत. या विधान परिषद निवडणुकीत पक्षाने आपल्याला संधी द्यावी, अशी तीव्र इच्छा साळवी यांनी नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना सामावून घेण्यासाठी कोकणच्या जागेबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >