Thursday, August 13, 2026

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रणाला चालना देण्यासाठी कृषी विभाग व आत्मा, नाशिक यांच्या माध्यमातून एकाच दिवशी पक्षी थांबे उभारण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. कृषी सखी व शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सुमारे १ हजार एकर क्षेत्रावर १० हजार पक्षी थांबे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

शेतात ‘T’ आकाराचे पक्षी थांबे

शेतकऱ्यांनी शेतात ‘T’ आकाराचे पक्षी थांबे उभारून मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मैना, चिमणी, कोतवाल, बुलबुल यांसारखे कीटकभक्षी पक्षी या थांब्यांवर बसून पिकांवरील अळ्या व किडींचे भक्षण करतात. त्यामुळे किडींचे नैसर्गिक नियंत्रण होऊन रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व व उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. तसेच जैवविविधता व पर्यावरणीय संतुलन राखण्यास हातभार लागतो.

नैसर्गिक कीड व्यवस्थापनाबाबत मोहिम

मोहिमेदरम्यान कृषी सखी, आत्मा यंत्रणेतील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM), सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (ATM) तसेच कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पक्षी थांब्यांचे महत्त्व, निर्मितीची पद्धत, योग्य जागेची निवड व कीड व्यवस्थापनातील उपयोगाबाबत मार्गदर्शन केले. पक्षी थांब्यांसाठी बांबू, लाकडी काठी, GI पाईप किंवा स्थानिक साहित्याचा वापर करता येतो. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून आगामी काळात जीवामृत, दशपर्णी अर्क, जैविक निविष्ठांचा वापर, जैवविविधता संवर्धन व नैसर्गिक कीड व्यवस्थापनाबाबत विविध मोहिमा व प्रात्यक्षिके घेण्यात येणार असल्याची माहिती अभिमन्यू काशीद, प्रकल्प संचालक (आत्मा), नाशिक यांनी दिली.

जीवांचे संवर्धन करून शाश्वत शेतीकडे वाटचाल

तर शाश्वत शेतीसाठी उत्पादनवाढीसोबत नैसर्गिक परिसंस्था मजबूत करणे आवश्यक आहे. कीटकभक्षी पक्षी हे शेतकऱ्यांचे नैसर्गिक मित्र असून, पक्षी थांब्यांमुळे हानिकारक किडींच्या नियंत्रणास मदत होते. शेतकऱ्यांनी पक्षी, मधमाश्या व इतर उपयुक्त जीवांचे संवर्धन करून पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, असे रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले. तर राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नैसर्गिक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापनासाठी विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी सखींच्या माध्यमातून जिल्हाभर पक्षी थांबे लावण्याची मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढत असल्याचे दिसून येते, असे अभिमन्यू काशीद, प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >