Tuesday, May 19, 2026

संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या ३ वर्षांत मुंबई-महानगरात २७ जेट्टी कार्यान्वित करणार

मुंबई : "मुंबई महानगर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीचा प्रवास अधिक वेगवान, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने तब्बल २७ आधुनिक जेट्टी कार्यान्वित करण्यात येणार असून, आगामी काळात ही जलवाहतूक सेवा संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोडेल," अशी माहिती घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. मुंबईत आयोजित एका वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. लॉजिस्टिक आणि प्रवासी वाहतुकीसाठी रस्ते किंवा रेल्वेपेक्षा जलमार्ग हा सर्वात स्वस्त आणि वेगवान पर्याय असल्याने सरकार या क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, "अनेक वर्षांपासून मुंबईत जलवाहतूक आणि 'रो-रो' सेवेबाबत केवळ चर्चाच सुरू होत्या. माझ्या मागील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आम्ही प्रत्यक्ष पावले उचलत भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) अशी रो-रो सेवा सुरू केली, जी आज प्रचंड यशस्वी ठरली आहे. याच धर्तीवर आता आम्ही संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात एकात्मिक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचे काम हाती घेतले आहे." मुंबई आणि उपनगरांना सागरी मार्गाने जोडण्यासाठी वेगवेगळ्या २७ ठिकाणी अत्याधुनिक जेट्टी आणि पायाभूत सुविधांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील ३ वर्षांत ही कामे विविध टप्प्यांत पूर्ण केली जातील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांचा ताण आणि प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होईल. मुंबईच्या या जलवाहतूक नेटवर्कचा विस्तार करून पुढे संपूर्ण कोकण किनारपट्टी जलमार्गाने मुंबईशी थेट जोडली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'लॉजिस्टिक' खर्च कमी होणार जलमार्गाच्या आर्थिक फायद्यांवर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "देशाच्या किंवा राज्याच्या आर्थिक विकासात लॉजिस्टिक कॉस्ट (वाहतूक खर्च) अत्यंत महत्त्वाची असते. रस्त्यांच्या तुलनेत जलमार्गाने होणारी वाहतूक ही अत्यंत स्वस्त असते. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीसाठीही हा जलमार्ग क्रांती घडवून आणेल." या शाश्वत पर्यायामुळे मुंबई ते कोकण प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार असून स्थानिक पर्यटनालाही यामुळे मोठी उभारी मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा