Tuesday, May 19, 2026

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत शोकाकुल आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेमुळे डहाणूतील बापूगाव गावावर दुःखाचे मोठे सावट पसरले असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. या सामूहिक अंत्यविधीच्या वेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्वतः उपस्थित राहून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली व पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले.अंत्यविधीदरम्यान संपूर्ण बापूगाव आणि परिसरातील नागरिक भावुक झाले होते. ग्रामस्थांचे अश्रू थांबत नव्हते. बापूगावच्या सरपंचांनीही यावेळी अश्रूंना वाट मोकळी करून देत, या अत्यंत गरीब आणि गरजू मृत कुटुंबांना शासनाने तातडीने मोठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.

दुःखात बुडालेल्या ग्रामस्थांशी संवाद साधताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांप्रती सखोल सहानुभूती दर्शविली आहे. अपघातातील जखमींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार केले जात असून, त्यांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात ये-जा करण्यासह सर्व आवश्यक सुविधा प्रशासनामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आदिवासी विकास विभाग पूर्णपणे 'पालकत्वाची' भूमिका निभावेल आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल.

परिसरात हळहळ

या सामूहिक अंत्यसंस्काराला मृतांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि कुटुंबीयांना धीर देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती. यामध्ये खासदार हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावीत, आमदार विनोद निकोले, माजी आमदार विलास तरे स्थानिक नेते भरत राजपूत, जिल्हाधिकारी, एटीसी अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या भीषण अपघाताने केवळ बापूगावच नव्हे, तर संपूर्ण पालघर जिल्हा हादरला आहे. पीडित कुटुंबांना या अथांग दुःखातून सावरण्यासाठी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थाही मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.

Comments
Add Comment