Saturday, May 9, 2026

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार

मुंबई : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे मासेमारी बंदर असलेल्या सातपाटी मत्स्यबंदर विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सातपाटी येथील मासेमारी बंदर हे जागतिक दर्जाचे बंदर म्हणून विकसित करण्यात येणार असून, यामुळे मच्छीमार बांधवांच्या घरात आर्थिक समृद्धी आणि भरभराट येईल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या सोहळ्याला पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार मनीषा चौधरी, आमदार राजेंद्र गावित, आमदार राजन नाईक, आमदार विलास तरे, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, सातपाटीच्या सरपंच सीमा भोईर आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. सातपाटी खाडीच्या तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना नौकावाहतुकीदरम्यान अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून हा विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बंदरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून, मासेमारी व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या २४ महिन्यांत हे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमात बोलताना नितेश राणे म्हणाले की, “मच्छीमारांच्या हक्कासाठी देशातील पहिले स्वतंत्र मत्स्यव्यवसाय मंत्रालय महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देऊन शेतकऱ्यांप्रमाणे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. बेकायदा पर्ससीन आणि एलईडी मासेमारी रोखण्यासाठी ड्रोन आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणांचा वापर केला जात आहे. आतापर्यंत १४५ हून अधिक बेकायदा बोटींवर कारवाई करण्यात आली असून, याला आळा घालण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनीही सहकार्य करावे", असे आवाहन त्यांनी केले.

‘पापलेट’च्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे

या प्रकल्पामुळे सातपाटी खाडीतील गाळाचा प्रश्न सुटणार असल्याने मच्छीमारांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल. राज्य मासा असलेल्या ‘पापलेट’च्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही यावेळी नितेश राणे यांनी नमूद केले. या विकासकामामुळे सातपाटी बंदर कोकण किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >