Saturday, May 9, 2026

SSC Result 2026 : महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ९२.०८ टक्के

SSC Result 2026 : महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ९२.०८ टक्के

यंदा ७७ शाळांचा निकाल १०० टक्के; ६६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या (एसएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी दिनांक ८ मे २०२६ रोजी जाहीर झाला आहे. महानगरपालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून एकूण १५,९०३ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ हजार ६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महानगरपालिकेच्या शाळांचा सरासरी निकाल ९२.०८ टक्के इतका लागला आहे. एकूण ७७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, ६६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागातील सीताराम मिल कंपाऊंड माध्यमिक शाळेतील स्वयं शेखर गोरेगावकर या विद्यार्थ्यांने ९७.६० टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. के पश्चिम विभागातील डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूलमधील अशिया जाकीर सय्यद या विद्यार्थिनीने ९६.२० टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच प्रभादेवी मुंबई पब्लिक स्कूलमधील दीपक अरुण तिवारी आणि गोखले रोड मुंबई पब्लिक स्कूलमधील जिनल हरेश सुमेसरा या दोघांनी ९५.८० टक्के गुण प्राप्त करीत तृतीय क्रमांक पटकावला आहे. महानगरपालिकेच्या शाळांचा मागील चार वर्षांचा निकाल पाहता मार्च २०२३ मध्ये ८४.७७ टक्के, मार्च २०२४ मध्ये ९१.५६ टक्के, मार्च २०२५ मध्ये ९२.९२ टक्के तर या वर्षी म्हणजेच मार्च २०२६ मध्ये ९२.०८ टक्के इतका निकाल लागला आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर तसेच शिक्षण अधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महानगरपालिका सभागृहानेही या यशवंत विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, पालकांचे व शिक्षण विभागाच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. सभागृहात या अभिनंदनासाठी शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी निवेदन केले. त्यानंतर सर्वांनी यांनी बाके वाजवून, यशवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांचा सराव होण्याकरिता शिक्षण मंडळाच्या धर्तीवर शालेय स्तरावर दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येतात. सर्व अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देवून मार्गदर्शन करण्यात येते. दरमहा दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात येतात. निकाल वृद्धीबाबत शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. शिक्षण मंडळाच्या नियमकांची व्याख्याने आयोजित केली जातात. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षणीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय साधून वेळोवेळी निकालवृद्धीसाठी सभाही घेण्यात येतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >