Saturday, May 9, 2026

SSC Result 2026 Marathi : दहावीच्या निकालातील धक्कादायक वास्तव : 'मायमराठी'तच राज्यातील ८० हजारांहून अधिक विद्यार्थी नापास!

SSC Result 2026 Marathi : दहावीच्या निकालातील धक्कादायक वास्तव : 'मायमराठी'तच राज्यातील ८० हजारांहून अधिक विद्यार्थी नापास!

एका बाजूला महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठे वादंग सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे आपल्याच राज्यात मराठी भाषेची (Marathi Subject) क्षणिक अवस्था किती चिंताजनक आहे, हे नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालावरून (SSC Result 2026) चव्हाट्यावर आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) शुक्रवारी ऑनलाईन निकाल जाहीर केला. यंदा तब्बल १२ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आणि राज्याचा एकूण निकालही ९२ टक्क्यांच्या घरात गेला. पण या आनंदोत्सवात महाराष्ट्राला अंतर्मुख करणारी बाब म्हणजे, 'प्रथम भाषा' म्हणून मराठीचा अभ्यास करणाऱ्या १० लाख ८७ हजार ६९९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८० हजार ८०३ (सुमारे ७ टक्के) विद्यार्थी नापास झाले आहेत. एवढेच नाही तर, द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी निवडलेल्या ४ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ७४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले आहेत. मायबोलीतील ही घसरण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत गंभीर आणि धोक्याचा इशारा मानली जात आहे.

वाचनाचा अभाव आणि शुद्धलेखनातील चुकांचा फटका

मराठी विषयात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास का होत आहेत? यावर शिक्षणतज्ज्ञांनी गांभीर्याने चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, आजच्या विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाचा प्रचंड अभाव आहे. तसेच, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांच्या शुद्धलेखनात भयंकर चुका होत आहेत, ज्याचा थेट फटका बोर्डाच्या परीक्षेत बसत आहे. आजच्या पिढीला मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी केवळ पारंपरिक पद्धतीने शिकवून चालणार नाही, तर शिक्षकांच्या शिकवण्याच्या तंत्रातही आमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे. याशिवाय, सध्या केवळ दहावीपर्यंतच मराठी विषय अनिवार्य आहे; मात्र त्यात कायद्याने सुधारणा करून ही सक्ती थेट बारावीपर्यंत वाढवावी, अशी आग्रही मागणी आता शिक्षणतज्ज्ञांकडून जोर धरू लागली आहे.

राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के

संपूर्ण राज्याच्या निकालाचा विचार केल्यास, यंदा दहावीचा एकूण निकाल ९२.०९ टक्के इतका समाधानकारक लागला आहे. राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमधून (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) तब्बल १५ लाख ५५ हजार ०२६ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली आणि त्यातील १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने आपली शैक्षणिक मक्तेदारी आणि चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. कोकण विभागाने सर्वाधिक ९७.६२ टक्के निकालासह राज्यात पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकावला आहे.

गुजराती १००%, तर अरेबिक ९९% पार

एकीकडे राज्याच्या मुख्य भाषेत विद्यार्थी अडखळत असताना, इतर भाषांच्या निकालाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून 'गुजराती' विषयाची निवड करणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे ३०२ (१०० टक्के) विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. तसेच, 'संस्कृत' भाषेची निवड करणाऱ्या ९६ हजार ३३१ विद्यार्थ्यांपैकी ९५ हजार ५७१ विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. यासोबतच 'अरेबिक' भाषेच्या निकालानेही बाजी मारली असून, तब्बल ९९.५९ टक्के विद्यार्थी या विषयात उत्तीर्ण झाले आहेत. इतर भाषांमधील हे १०० टक्क्यांकडे झुकणारे घवघवीत यश आणि मराठीतील वाढती नापासांची संख्या, हा सध्या शिक्षण वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >