Tuesday, May 5, 2026

IPL 2026 MI vs LSG : रोहितचा कमबॅक होताच मुंबईने लय पकडली; लखनौवर ६ विकेटनं दणदणीत विजय

IPL 2026 MI vs LSG : रोहितचा कमबॅक होताच मुंबईने लय पकडली; लखनौवर ६ विकेटनं दणदणीत विजय

मुंबई : मुंबई इंडियन्सनं अखेर वानखेडे स्टेडियमवर दमदार विजय मिळवत चाहत्यांना दिलासा दिला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रेयान रिकल्टन यांच्या तुफानी सलामी भागीदारीनं मुंबईच्या विजयाचा पाया भक्कम केला, तर शेवटी नमन धीर यानं शांत आणि परिपक्व खेळी करत संघाला विजयापर्यंत नेलं.

प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं २२८ धावांचा प्रचंड स्कोअर उभारला. निकोलस पूरन यानं केवळ २१ चेंडूत ६३ धावा करत मुंबईच्या गोलंदाजांवर तुटून पडत डावाला वेग दिला. त्याला मिशेल मार्श (४४) आणि एडन मार्करम (३१) यांची साथ मिळाली. मधल्या फळीत हिम्मत सिंह यानं ४० धावांची उपयुक्त खेळी करत लखनौला २०० पार नेण्यात मोलाची भूमिका बजावली.

मुंबईकडून गोलंदाजीत कॉर्बिन बॉश सर्वाधिक प्रभावी ठरला. त्यानं २ महत्त्वाच्या विकेट घेतल्या. याशिवाय विल जॅक्स, एएम गजनफर आणि रघू शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत लखनौचा वेग काही प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न केला.

२२९ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि रिकल्टन यांनी पहिल्याच षटकापासून आक्रमण करत लखनौच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. दोघांनी मिळून १४३ धावांची भक्कम भागीदारी रचत सामन्याचा कल मुंबईकडे वळवला. ही भागीदारी मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली.

रिकल्टन ८३ धावांवर बाद झाला, मात्र तोपर्यंत सामना मुंबईच्या हातात आला होता. त्यानंतर रोहित शर्मानंही ८४ धावांची शानदार खेळी केली. दोघांच्या खेळीमुळे लखनौच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास ढासळला.

मात्र, रोहित बाद झाल्यानंतर थोडीशी घसरण पाहायला मिळाली. सूर्यकुमार यादव मोठी खेळी करू शकला नाही, तर मधल्या फळीत काही विकेट्स झटपट पडल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत सामन्यात रंगत निर्माण झाली.

अशा वेळी नमन धीर यानं जबाबदारी स्वीकारत संयमी फलंदाजी केली. त्यानं योग्य वेळी फटकेबाजी करत आणि स्ट्राइक रोटेट करत मुंबईला १८.४ षटकांत ४ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवलं आणि विजय निश्चित केला. त्याची ही खेळी संघासाठी निर्णायक ठरली.

या विजयासह मुंबई इंडियन्सनं हंगामातील तिसरा विजय मिळवला असला तरी त्यांचे ७ पराभव झाले असल्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पुढील सामने जिंकणे अत्यावश्यक ठरणार आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ संघाचा हा सातवा पराभव ठरला असून त्यांच्यासाठीही पुढील मार्ग खडतर झाला आहे.

गुणतालिकेवर या सामन्याचा मोठा परिणाम झाला नसला, तरी मुंबईच्या या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला आहे. वानखेडेवर मिळालेला हा विजय मुंबईसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो, अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा