Tuesday, May 5, 2026

Khalistani Terrorists : कॅनडाचा मोठा खुलासा! खलिस्तानी अतिरेकी ‘राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ घोषित

Khalistani Terrorists : कॅनडाचा मोठा खुलासा! खलिस्तानी अतिरेकी ‘राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ घोषित

कॅनडाच्या प्रमुख गुप्तचर संस्थेने खलिस्तानी अतिरेक्यांविरोधात गंभीर इशारा देत त्यांना देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. Canadian Security Intelligence Service (CSIS) च्या २०२५ च्या सार्वजनिक अहवालात हा खुलासा करण्यात आला असून, कॅनडामधील काही गट भारताशी संबंधित हिंसक कारवायांना आर्थिक आणि संघटनात्मक मदत करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अहवालानुसार, कॅनडामध्ये कार्यरत असलेले काही खलिस्तानी अतिरेकी (CBKEs) देशातील व्यवस्थेचा वापर करून निधी गोळा करत आहेत आणि तो हिंसक कारवायांसाठी वळवत आहेत. “हे घटक कॅनडाच्या समाजात मिसळलेले असून, स्थानिक संस्थांचा वापर करून आपला अजेंडा पुढे नेत आहेत,” असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, स्वतंत्र ‘खलिस्तान’ची मागणी करणे हे कॅनडामध्ये कायदेशीर असल्याचेही CSIS ने स्पष्ट केले आहे. परंतु, हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या आणि भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहान गटावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

अहवालात १९८५ मधील Air India Flight १८२ bombing चा उल्लेख करत, त्या हल्ल्यामागे अशाच अतिरेकी नेटवर्कचा हात असल्याचे नमूद केले आहे. या भीषण हल्ल्यात ३२९ जणांचा मृत्यू झाला होता, जो आजही कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.

दरम्यान, परकीय हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर भारतचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तानसोबत भारतावरही कॅनडामध्ये प्रभाव टाकण्याचा आरोप करण्यात आला आहे. काही राजकारणी, पत्रकार आणि इंडो-कॅनेडियन समुदायातील व्यक्तींशी गुप्त संबंध प्रस्थापित करून भारत आपले हितसंबंध साधत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२३ मध्ये जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येत भारताचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केला होता, जो भारताने फेटाळला होता.

त्यानंतर दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी पावले उचलली असून, राजनैतिक संवाद पुन्हा सुरू करण्यात आला आहे. व्यापार, गुंतवणूक आणि कायदा अंमलबजावणी क्षेत्रातही सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल पुढील महिन्यात कॅनडाला मोठ्या व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा अहवाल अधिकच महत्त्वाचा ठरत आहे.

Comments
Add Comment