Sunday, May 3, 2026

Air Force Rescue: शिडी तुटली आणि सुरू झाला १६ तासांचा थरार! रील बनवणाऱ्या मुलांना एअरफोर्सने कसं वाचवलं? अंगावर काटा आणणारी घटना

Air Force Rescue: शिडी तुटली आणि सुरू झाला १६ तासांचा थरार! रील बनवणाऱ्या मुलांना एअरफोर्सने कसं वाचवलं? अंगावर काटा आणणारी घटना
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे घडलेली ही धक्कादायक आणि थरारक घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. रविवारी सकाळी भारतीय हवाई दलाने राबवलेल्या विशेष बचाव मोहिमेत पाण्याच्या उंच टाकीवर अडकलेल्या दोन मुलांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले. जवळपास १६ तास या मुलांनी ना अन्न ना पाणी अशा परिस्थितीत टाकीवर जीव मुठीत धरून वेळ काढला होता. ही घटना कांशीराम रेसिडेन्शियल कॉलनी परिसरात घडली असून, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.
शनिवारी पाच मुले रील करण्याच्या उद्देशाने एका उंच पाण्याच्या टाकीवर चढली होती. मात्र, त्याच वेळी टाकीवर जाणारी शिडी तुटली आणि भीषण दुर्घटना घडली. सिद्धार्थ, शनी आणि गोलू ही तीन मुले खाली कोसळली, तर पवन आणि कल्लू ही दोन मुले टाकीच्या माथ्यावरच अडकून पडली. खाली पडल्यामुळे सिद्धार्थचा जागीच मृत्यू झाला, तर शनी आणि गोलू यांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने माधव प्रसाद त्रिपाठी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, टाकीवरील शिडी पूर्णपणे निकामी झाल्याने वर अडकलेल्या मुलांना खाली उतरण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. परिस्थिती गंभीर होत चालल्याने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक गोरखपूरहून रात्री घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे त्यांची उपकरणे आणि लिफ्ट वापरणे शक्य झाले नाही, त्यामुळे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर भारतीय हवाई दलाला पाचारण करण्यात आले. गोरखपूर येथील सेंट्रल एअर कमांडमधून Mi-17V5 हेलिकॉप्टर तात्काळ रवाना करण्यात आले. रविवारी पहाटे सुमारे ५:२० वाजता हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले आणि बचाव मोहिमेला सुरुवात झाली.
 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

हवाई दलाच्या प्रशिक्षित जवानांनी अत्यंत धाडस आणि कौशल्य दाखवत अवघ्या १५ मिनिटांत टाकीवर अडकलेल्या दोन्ही मुलांना सुरक्षितपणे खाली आणले. जवळपास १६ तास मृत्यूच्या छायेत राहिलेल्या या मुलांसाठी हा क्षण नवजीवन देणारा ठरला. सुटका केल्यानंतर, त्याच हेलिकॉप्टरमधून मुलांना गोरखपूर येथे नेण्यात आले, जिथे त्यांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यापूर्वी प्रशासनाने रात्रीच टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी शिडी तयार करण्याचा प्रयत्न सुरू केले होते. पहाटे ३ वाजेपर्यंत शिडीचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले होते, मात्र अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काम थांबवावे लागले. परिणामी, परिस्थिती अधिक बिकट होण्यापूर्वी हेलिकॉप्टरद्वारे बचाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो अत्यंत यशस्वी ठरला.
Comments
Add Comment