Thursday, April 30, 2026

BMC News : डॉक्टरांच्या कंत्राटी नियुक्तीवर शिवसेना नगरसेवक नाराज

BMC News : डॉक्टरांच्या कंत्राटी नियुक्तीवर शिवसेना नगरसेवक नाराज

- डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीवर नेमू नका

मुंबई (सचिन धानजी )

डॉक्टर हे कंत्राटी कसे काय असा सवाल करत डॉक्टरांना कंत्राटी या संज्ञेत बसून एकप्रकारे त्यांच्या पदाचा अपमान केला जात आहे अशा तीव्र शब्दांत शिवसेना नगरसेविका डॉ अदिती भास्कर खुरसुंगे यांनी नाराजी व्यक्त केली.डॉक्टर हा काही डेली वेजेसवर काम करणारा कामगार नाही.आपण डॉक्टरची नियुक्ती कंत्राटी करतो. महापालिका रुग्णालयात डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याची पद्धत बंद व्हायला पाहिजे. डॉक्टर कायम सेवेत असेल तरच तो रुग्णाला चांगली सेवा देऊ शकतो. त्याला वेठबिगार सारखे वागवू नका, अशी सूचना खुरसुंगे यांनी केली.

मुंबई महापालिकेच्या सन 2026-27च्या अर्थसंकल्पवर बोलताना शिवसेना नगरसेविका डॉ. रिद्धी खुरसुंगे यांनी आरोग्य व्यवस्थापनातील त्रुटीवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले. त्यांनी डॉक्टरांच्या नियुक्तीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या,आता काही दवाखाने आणि अन्य ठिकाणी आपण जे डॉक्टर भरतो ते अन्य राज्यातून आलेले अधिक असतात आपल्याला गरज आहे म्हणून आपण त्यांना सामावून घेतो. परंतु मुंबईत किंवा राज्यातील विविध वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांच्या तुलनेत अन्य राज्यामधून जेव्हा हे शिकाऊ डॉक्टर येतात, त्यांचे प्रमाणपत्र तपासायला नको का असा सवाल त्यांनी केला. आज मुंबईत बरेच बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारी येतात. त्यांच्याकडील वैद्यकीय शिक्षणाच्या पदव्या बाेगस असतात, मग आपण त्यांच्या डिग्रीची कागदपत्रे तपासणार नसू तर मग त्यातून एखादा बोगस डॉक्टर निघाला तर सर्वच डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्यामुळे डॉक्टरांची नियुक्ती तथा नेमणूक करताना त्यांची कागदपत्रे काटेकोरपणे तपासली गेली पाहिजे अशी अशी सूचना त्यांनी केली.

मोठ्या रुग्णालयांच्या तुलनेत दवाखाने, आरोग्य केंद्र, प्रसुतीगृहांचा दर्जा एवढा वाढवा की आपल्याला अपवादात्मक परिस्थितीत आणि मोठ्या आजारांसाठी प्रमुख रुग्णालयांमध्ये जावे लागेल. त्यामुळे आपल्याला आरोग्य व्यवस्थेला या सुस्थितीत आणून ठेवावे लागेल.

बोरिवलीतील भगवती रुग्णालय इथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे. एवढेच नाही तर सर्व उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुपर स्पेशालिटीच्या दर्जा देऊन चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा तिथे देण्यात याव्यात. जेणेकरून पश्चिम उपनगरातील किंबहुना पालघर,वसई, विरार या ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना मुंबईतील प्रमुख रुग्णालयात न जाता पश्चिम उपनगरातील या रुग्णालयात उपचार घेता येऊ शकतात. त्यामुळे या मोठ्या रुग्णालयावरील ताण कमी होईल.

सध्या रक्ताचा तुडवडा मोठ्याप्रमाणात निर्माण होत असून अनेक रुग्णालयांमध्ये रक्तांची मागणी वाढत आहे. पूर्वी रक्तदान शिबिर मोठ्याप्रमाणात व्हायच्या, परंतु आता हे प्रमाण कमी झाले असून महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात वर्षांतून दोनदा रक्तदान शिबिर राबवून रक्तदान मोहिम राबवायला हवी. तरच रक्तांचा झालेला तुटवडा आपल्याला भरुन काढता येईल अशी सूचना खुरसुंगे यांनी केली. तसेच आपल्याला प्रत्येक रुग्णालयात रक्तपेढी बनवली गेली पाहिजे. उपनगरीय रुग्णालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर रक्तपेढ्या निर्माण करण्यात याव्यात आणि यामाध्यमातून आपण जास्तीत जास्त रक्तबँक निर्माण करू शकतो असेही त्यांनी सांगितले.

आपण काही वर्षांपूर्वी मियावकी गार्डन ही शहरी वनीकरणाची संकल्पना राबवली होती. पण ती आता कुठे आहे, झिरो वेस्ट ही संकल्पना कुठे आहे असा सवाल करत या सर्व योजना प्रत्येक प्रभागांत जेव्हा पोहोचतील तेव्हाच आपल्याला याचा निकाल पहायला मिळेलअसे सांगितले.. एवढेच नाही मानवाच्या आरोग्यासोबतच मूक प्राण्यांच्या आरोग्यासाठीही प्रत्येक विभागात प्राणी रुग्णालये असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक परिमंडळात एक अशाप्रकारे ऍनिमल हॉस्पिटल उभारण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार करण्यात यावा अशाही सूचना केल्या.

ज्याप्रमाणे आपण मेडिकल कॉलेजमध्ये खासगी वैद्यकीय जागांचे नियमन करतो, त्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि इतर महापालिका रुग्णालयांमध्ये इंटर्नशिप सक्तीची करण्यात यावी. तसेच महापालिका रुग्णालयात शिकणाऱ्या सर्व डॉक्टरांना किमान १० वर्षे महापालिका रुग्णालय, दवाखाना , प्रसूतीगृह,याठिकाणी सेवा देणे बंधनकारक असेल असे प्रवेशाच्या वेळी हमीपत्र लिहून घ्यावे . बहुतांशी मुले पैसे भरून यातून सुटका करून घेतात, त्यांना सवलत देण्यात येऊ नये.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा