सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग पूर्ण होत असल्याने जरी टोल सुरू झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘एम एच -०७’ पासिंगच्या वाहनांना कोणताही टोल लागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा आणि जिल्ह्याला खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल असाच ‘शक्तीपीठ’ महामार्ग तयार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहितीही पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. सावंतवाडी दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा नव्याने तयार करण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि विशेषतः रेडी बंदराला मोठा फायदा होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेऊन प्रशासकीय बैठका पार पडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, बांदा व परिसरातील गावे या प्रकल्पामुळे बाधित होणार नाहीत, अशा पद्धतीने मार्ग काढण्यात आला आहे. हा मार्ग रेडी पोर्टला जोडला जाणार असून, कोणत्याही संघर्ष समितीच्या पत्रावर नव्हे तर जनहिताचा विचार करून सरकार निर्णय घेत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे ओसरगाव टोल नाका सुरू झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'एमएच -०७ ' क्रमांकाच्या कोणत्याही वाहनाला टोल भरावा लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग : 'प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांचेही समर्थन आहे. जो कोणी ...






