Tuesday, April 21, 2026

CM Devendra Fadnavis : 'अर्बन नक्षलवाद’ आणि अराजकता पसरवणाऱ्या शक्तींना युवाशक्तीच रोखणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

CM Devendra Fadnavis : 'अर्बन नक्षलवाद’ आणि अराजकता पसरवणाऱ्या शक्तींना युवाशक्तीच रोखणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

- भाजयुमोच्या ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा प्रारंभ

मुंबई : राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि 'अर्बन नक्षलवादा'च्या माध्यमातून तरुणांच्या मनात संविधानाविरुद्ध विष पेरणाऱ्या शक्तींना रोखण्याचे काम 'युवाशक्ती जागर यात्रा' करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या राजव्यापी यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा अधिकृत प्रारंभ केला. मुख्यमंत्री म्हणाले की, "महाराष्ट्रात ३५ वर्षांखालील तरुणांची लोकसंख्या ६५ टक्के आहे. ही मोठी शक्ती जर संघटित होऊन एका दिशेने चालली, तर राज्यात मोठे परिवर्तन घडून येईल. मात्र, सध्या काही शक्ती युवकांमध्ये संविधानाविरुद्ध कलुषित मते पसरवत आहेत. या तरुणांना संविधानाने दिलेल्या व्यवस्थेप्रती जागृत करण्याची जबाबदारी युवा मोर्चा पार पाडेल."

महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर कठोर शब्दांत टीका केली. "संसदेत विरोधकांनी महिला आरक्षणाची जणू 'भ्रूणहत्या'च केली. जनगणना आणि पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) नावाखाली विरोधक खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. मुळात त्यांना आरक्षण द्यायचेच नाही, ही त्यांची बुरसटलेली मानसिकता आहे. या यात्रेच्या माध्यमातून नारीशक्तीला जागृत करून विरोधकांना या विधेयकाला पाठिंबा देण्यास भाग पाडले जाईल," असेही फडणवीस यांनी नमूद केले.

यात्रेचे स्वरूप आणि उद्दिष्टे :

  • भाजयुमोची ‘युवाशक्ती जागर यात्रा' संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून शेतकरी, कामगार आणि आयटी क्षेत्रातील तरुणांपर्यंत पोहोचणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्यामुळे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय व सामाजिक प्रगल्भता येईल.
  • कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाला राज्यातील पहिल्या क्रमांकाची संघटना बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या योजना गावखेड्यातील शेवटच्या तरुणापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
  • कृष्णराज महाडिक यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देताना सांगितले की, केवळ राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील नेत्यांचे आणि विद्यार्थी चळवळीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या यात्रेसाठी घेण्यात आले असून, राज्यातील संपूर्ण युवावर्ग या मोहिमेत जोडला जाईल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >