Wednesday, August 5, 2026

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पलायन केलं होतं. तेव्हापासून शेख हसीना या भारतात असल्याचं सांगितलं जातं. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत शेख हसीना या एकदाही सार्वजनिकरीत्या समोर आलेल्या नाहीत. तसेच काही दिवसांपूर्वी शेख हसीना यांनी आपण डिसेंबरमध्ये मायदेशी परतणार असल्याचंही सांगितलं होतं.

गेल्या दोन वर्षांनंतर आता पहिल्यांदाच शेख हसीना यांनी दिल्लीत व्हर्च्युअल पद्धतीने सार्वजनिकरीत्या माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेख हसीना यांनी बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या उठावाबाबत आणि त्यांच्या बांगलादेशात परतण्याबाबतच्या संभाव्य निर्णयावर भाष्य केलं. ‘बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर होतं, विद्यार्थ्यांचं आंदोलन नव्हतं’, असं वक्तव्य शेख हसीना यांनी केलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं.

“बांगलादेशात २०२४ मध्ये झालेली निदर्शने हे कधीच विद्यार्थ्यांचे नव्हते. तो एक नियोजित आखलेला कट होता. ज्याचा उद्देश आमचं सरकार सत्तेतून हटवणं आणि लोकशाही प्रक्रियेबाहेर जाऊन नवीन सत्ता स्थापन करणं हा हेतू होता”, असा आरोप शेख हसीना यांनी आपल्या ऑडिओ संवादात बोलताना केला. “गेल्या दोन वर्षांत मी माझ्या बांगलादेशाला हाल, अपेष्टा सहन करताना पाहत आहे. हा तो बांगलादेश नाही, जो आम्ही घडवला होता. हा तो बांगलादेश नाही, ज्यासाठी १९७१ मध्ये ३० लाख लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं. जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये जी काही निदर्शने झाली होती, ते विद्यार्थ्यांचे निदर्शने नव्हतेच. सुरुवातीपासून माझ्या सरकारने संवाद, कायदेशीर प्रक्रिया आणि संयमाच्या माध्यमातून हा प्रश्न शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला. पण काही संघटित गट विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं रूपांतर हिंसक राजकीय हत्यारात करण्याच्या प्रयत्न केला”, असंही त्या म्हणाल्या. यावेळी शेख हसीना यांनी त्यांच्या वडिलांची आठवण काढली आणि त्या भावुक झाल्या. शेख हसीना म्हणाल्या की, “त्यांना मुजीबुर रहमान यांचं अस्तित्वच पुसून टाकायचं आहे.” पण आमच्या पक्षावरील बंदी उठवली जावी आणि आपण मायदेशी परतणारच असा पुनरुच्चारही शेख हसीना यांनी केला.

मायदेशी परतणार : बांगलादेशात परतण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना हसीना म्हणाल्या की, “आपण या वर्षी डिसेंबरपर्यंत मायदेशी परतणार आहोत. तेथे परतल्यानंतर ते मला अटक करू शकतात किंवा कदाचित माझी हत्याही करू शकतात. पण तरीही मला तिथे जावेच लागेल.”

मित्रराष्ट्रांना आवाहन : एका संदेशात शेख हसीना यांनी म्हटलं की, लोकशाही, न्याय आणि शांततेसाठी सुरू असलेल्या बांगलादेशातील जनतेच्या लढ्यात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन मी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि बांगलादेशाच्या सर्व मित्रराष्ट्रांना करते. दक्षिण आशिया आणि बंगालच्या उपसागराच्या दृष्टीने एक स्थिर बांगलादेश अत्यंत महत्त्वाचा आहे, असंही त्या म्हणाल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >