Tuesday, April 14, 2026

Samrat Choudhary : बिहारमध्ये 'सम्राट' पर्व सुरू; उद्या सम्राट चौधरी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

Samrat Choudhary : बिहारमध्ये 'सम्राट' पर्व सुरू; उद्या सम्राट चौधरी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

पाटणा : बिहारच्या राजकारणात आज एक मोठी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. सुमारे दोन दशके मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) यांची बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. आज पाटणा येथील बिहार विधानसभा इमारतीच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या एनडीएच्या (NDA) महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नितीश कुमार यांचा राजीनामा आणि दिल्लीकडे प्रस्थान

आज मंगळवारी नितीश कुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेऊन विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली आणि त्यानंतर राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला. नितीश कुमार यांनी यापूर्वीच ३० मार्च २०२६ रोजी विधान परिषदेच्या (MLC) सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. १६ मार्च रोजी त्यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली असून, ११ एप्रिल रोजी त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. आता ते राज्याच्या राजकारणातून केंद्रात, म्हणजेच दिल्लीत सक्रिय होणार आहेत. मात्र, जेडीयूचे कार्याध्यक्ष संजय कुमार झा यांनी स्पष्ट केले आहे की, नितीश कुमार जरी मुख्यमंत्री नसले तरी बिहारच्या विकासासाठी ते मार्गदर्शक म्हणून कायम सक्रिय राहतील.

सम्राट चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यांचे नाव विजय कुमार सिन्हा यांनी प्रस्तावित केले, तर रेणू देवी, मंगल पांडे आणि दिलीप जयस्वाल यांनी त्यास अनुमोदन दिले. केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकृतपणे सम्राट चौधरी यांच्या नावाची घोषणा केली. या बदलामुळे बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उद्या होणार शपथविधी

नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. बिहार विधानसभेच्या एकूण २४३ सदस्यांच्या संख्याबळानुसार मंत्रिमंडळात ३६ मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांना कायम ठेवले जाण्याची शक्यता असून, नवीन सरकारमध्ये केवळ काही किरकोळ बदल पाहायला मिळू शकतात. २०३० पर्यंतचा जनादेश हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि एनडीएच्या पाठिंब्याने मिळाला असल्याने, नवीन सरकार नितीश कुमार यांचीच धोरणे पुढे नेणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >