पाटणा : राज्यसभा खासदार आणि जेडीयूचे सर्वोच्च नेते नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पाटणा येथे लोकभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेऊन नितीश यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. आता नितीशकुमार राज्यसभा खासदार म्हणून काम करतील. ते एनडीए अर्थात रालोआमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचीही शक्यता आहे. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले. भावनांनी ओथंबलेल्या या पत्रातून बिहारसाठी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांचा थोडक्यात लेखाजोखा नितीश यांनी मांडला आहे.
नितीश यांनी पहिल्यांदा २४ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. राज्यात पहिल्यांदाच एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. नितीश यांनी सत्तेत आल्यापासून बिहारमध्ये कायदा सुव्यवस्थेचे राज्य निर्माण करण्यावर भर दिला. समाजातील मागासवर्गीयांच्या भल्यासाठी काम केले. बिहारमध्ये सुशासन निर्मितीवर भर दिला. राज्याच्या विकासाला चालना दिली. दलित, महादलित अशा सर्वांसाठी काम केले. हिंदू, मुसलमान, सवर्ण, मागासवर्गीय असा भेद न करता सर्वांच्या कल्याणासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, शेती, महिला व बालकल्याण, युवा यांच्या भल्यासाठी काम करण्यावर भर दिला.
आता राज्यसभेचा सदस्य असलो तरी बिहारच्या कल्याणासाठी शक्य ते ते काम करणार असल्याचे नितीश यांनी जनतेला आश्वासन दिले आहे. एनडीएने बिहारच्या विकासाकरिता २०३० पर्यंतचा कार्यक्रम तयार केला आहे. या कामाला गती मिळावी यासाठी दिल्लीतून आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे नितीश यांनी जाहीर केले आहे. देशातील अव्वल राज्यांमध्ये बिहारचा समावेश व्हावा यासाठी काम करणार असल्याचे नितीश यांनी जनतेला वचन दिले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बिहारसाठी काम करणाऱ्या सरकारला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचेही नितीश यांनी पत्रातून जाहीर केले आहे.






