Friday, February 20, 2026

पश्चिम रेल्वेच्या होळीनिमित्त ६ विशेष गाड्या

पश्चिम रेल्वेच्या होळीनिमित्त ६ विशेष गाड्या

कानपूर आणि काठगोदामसाठी धावणार सुपरफास्ट ट्रेन

मुंबई (प्रतिनिधी): होळीच्या सणानिमित्त रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची सोय आणि वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथून उत्तर प्रदेशातील कानपूर आणि उत्तराखंडमधील काठगोदाम या मार्गांवर विशेष साप्ताहिक सुपरफास्ट गाड्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली.

मुंबई सेंट्रल येथून काठगोदाम (उत्तराखंड) आणि कानपूर (उत्तर प्रदेश) साठी विशेष साप्ताहिक सुपरफास्ट गाड्या चालवल्या जाणार आहेत. मुंबई सेंट्रल – काठगोदाम (ट्रेन क्र. ०९०७५): दर बुधवारी सकाळी १०:५५ वाजता मुंबई सेंट्रलवरून सुटेल. मुंबई सेंट्रल – कानपूर अनवरगंज (ट्रेन क्र. ०९१८५): दर रविवारी सकाळी १०:५५ वाजता मुंबई सेंट्रलवरून प्रस्थान करेल. तसेच जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या पालिताना आणि पवित्र हरिद्वार नगरीसाठी देखील विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे टर्मिनस – पालिताना (ट्रेन क्र. ०९०२३): ही गाडी २७ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी रात्री ९:४५ वाजता सुटेल. ही गाडी बोरिवली, वापी, सूरत आणि अहमदाबाद या प्रमुख स्थानकांवर थांबेल. साबरमती – हरिद्वार (ट्रेन क्र. ०९४२५): दर सोमवारी सायंकाळी ६:४५ वाजता साबरमतीवरून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री हरिद्वारला पोहोचेल. इंदूर – हजरत निजामुद्दीन (ट्रेन क्र. ०९३०९): ही द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट गाडी दर शुक्रवारी आणि रविवारी इंदूरवरून सुटेल. उधना – मालदा टाउन (ट्रेन क्र. ०३४१८): पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी २ मार्च ते २३ मार्च दरम्यान दर सोमवारी ही गाडी उधना (सूरत) येथून धावेल.

या सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर आणि आरक्षण केंद्रांवर सुरू झाले आहे. या गाड्यांमध्ये एसी २-टियर, एसी ३-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लासचे डबे उपलब्ध असतील. वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी या दोन्ही गाड्यांमध्ये एसी २-टियर , एसी ३-टियर , स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लासचे डबे उपलब्ध असतील. या गाड्या विशेष भाड्यावर चालवल्या जाणार आहेत.

होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेने राजकोट – महबूबनगर विशेष ट्रेनच्या फेऱ्या देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गुजरात आणि तेलंगणा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. होळीच्या काळात रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असते, तरी प्रवाशांनी आपली तिकिटे आगाऊ आरक्षित करून आपला प्रवास सुखकर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >