
अहिल्यानगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून जो पर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याची घोषणा जरांगेने केली आहे. ऐन गणेशोत्सवात सुरू केलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मुंबईत दाखल झाल्याने, त्याचा परिणाम प्रशासन आणि वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना, राष्ट्रवादी कोंग्रेस नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरून मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी घटनेत बदल करता येऊ शकतो असे विधान केले आहे, त्यासाठी त्यांनी तामिळनाडूचा संदर्भ घेत हे शक्य होऊ शकते, असे म्हंटले आहे. त्यांच्या या विधानामुळे मराठा समाज अरक्षणाबाबात आणखीनच आशावादी होण्याची शक्यता आहे.
नुकताच शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतला आहे. शरद पवार यांनी अहिल्यानगरमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली, यादरम्यान ते बोलत होते.
काय म्हणाले शरद पवार?
या कार्यक्रमात मराठा समाजाच्या आरक्षाविषयी बोलताना ते म्हणाले, ७२ टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये (Tamilnadu Reservation) होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते. घटनेत बदल (दुरुस्ती) करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटू शकतो.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्याबाबत आपली भूमिका जाहीर करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. यावर आता फडणवीस सरकार काय प्रतिक्रिया देते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच आज आझाद मैदानावर होत असलेल्या मराठा आंदोलनासाठी देण्यात आलेली एक दिवसाची मुदतवाढ देखील संपत आली आहे.
इतकेच नव्हे तर, गेले दोन दिवस मराठा आंदोलनात उसळलेली गर्दी आणि त्यामुळे मुंबईची विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्थेचा विचार करता सरकार काय निर्णय घेणार आहे, याकडे जनसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत.