कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर या दरम्यान धावणारी वंदे भारत आता मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, येत्या १५ दिवसांत ती टर्मिनसवरून धावण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
देशाच्या वाढीव मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान मुंबई : भारतातील अन्न उत्पादनातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणून मत्स्य उत्पादन ...
सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी ३ दिवस धावते. हीच ट्रेन पुण्यापर्यंत धावत असल्याने व्यापारी, प्रवासी, नोकरदार वर्गाची ती मुंबईपर्यंत सोडण्यात यावी, अशी मागणी होत होती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सोडण्यात यावी, अशी पुन्हा मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच ती सकाळी मुंबईला सोडण्यात यावी, असेही सांगितले. बियाणी म्हणाले, 'टर्मिनसवरून नवीन वंदे भारत थेट मुंबईपर्यंत धावणार आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचा परिणाम म्हणून ही रेल्वे मंजूर झाली आहे. लवकरच गाडीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.' त्यामुळे पुढील १५ दिवसांत मुंबई-कोल्हापूर यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत सध्या धावत आहे. तिचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. ती सोमवार, गुरुवार व शनिवार अशी तीन दिवस धावते. ती मिनी वंदे भारत २.० प्रकारातील असून, तिला एकूण ८ डबे असून तिची प्रवासी क्षमता ५५० इतकी असणार आहे. त्यात एसी चेअर कार व एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार या दोन प्रकारांच्या डब्यांचा समावेश आहे.