महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा प्रकाशन सोहळा नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.


मंडळाच्या स्थापनेपासून ‘पुस्तक प्रकाशन’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवून गंभीर, वैचारिक, संशोधनपर आणि मौलिक विषयांवरील ग्रंथनिर्मिती सातत्याने केली जात आहे. खासगी प्रकाशकांकडून सहसा प्रकाशित न होणारे उच्च दर्जाचे संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित करण्याची जबाबदारी मंडळ पार पाडत आहे. आजवर मंडळाने ७३० हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी नव्या ग्रंथांचे प्रकाशन करण्याची परंपरा जपली आहे.



संत, साहित्य, इतिहास आणि संगीताचा वैविध्यपूर्ण पट :


यंदाच्या ४२ ग्रंथांमध्ये विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण साहित्याचा समावेश आहे. वारकरी परंपरेतील संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या ‘तुकारामबावांच्या अभंगाची गाथा’ या ग्रंथाचा समावेश विशेष उल्लेखनीय आहे. तसेच अंजली मालकर लिखित ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध) या दोन खंडांत तेराव्या शतकापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या संगीत प्रवासाचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे.


मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर – कर्तृत्वाचा एक शोध’ हे तीन खंड प्रकाशित होत असून, त्यातील तिसऱ्या खंडात त्यांनी प्रथम मुद्रित केलेली ‘ज्ञानेश्वरी’ समाविष्ट आहे.


‘शिवशक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार विद्वत्तेचा महामेरु डॉ. सी. डी. देशमुख’, ‘मराठीतील रहस्य-रंजनप्रधान लोकप्रिय कादंबरी परंपरा आणि प्रवाह’, तसेच ओडिसी नृत्यशैलीवरील ‘ओद्रमागधी ते ओडिसी नृत्य – एक प्रवास’ हेही ग्रंथ प्रकाशित होत आहेत.



साहित्यिक परिचय मालिका:


१९४० ते १९९० या कालखंडातील महत्त्वाच्या साहित्यिकांवर आधारित परिचयात्मक ग्रंथमालिकेतील ग्रंथांचाही समावेश आहे. यात पु. ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, विंदा करंदीकर, अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे आदी साहित्यिकांच्या जीवन व साहित्याचा मागोवा घेण्यात आला आहे.


तसेच ‘रायगडची जीवनकथा’ या ग्रंथाचे आठवे पुनर्मुद्रण प्रकाशित होत असून या ग्रंथाला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.



नवलेखकांना संधी :


मंडळाच्या ‘नवलेखक अनुदान’ योजनेअंतर्गत यंदा १९ नवोदित लेखकांची पुस्तके प्रकाशित होत आहेत. काव्य, कथा, कादंबरी, नाटक, ललितगद्य आणि बालवाङ्मय अशा विविध साहित्यप्रकारांतील ही पुस्तके असून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा हा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे.



ग्रंथ ऑनलाईनही उपलब्ध :


मंडळाचे सर्व ग्रंथ https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच शासकीय मुद्रणालय व खाजगी वितरकांकडेही अत्यल्प दरात हे ग्रंथ उपलब्ध आहेत. वाचकांच्या भरघोस प्रतिसादामुळे अनेक ग्रंथांचे पुनर्मुद्रण करावे लागत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.


मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या प्रकाशन सोहळ्यामुळे मराठी साहित्य-संस्कृतीच्या जतन व संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Narsapur Case : नरसापूर प्रकरणात पोलिसांकडून गफलत; कोर्टाने कान उपटताच पोलीस आले लाईनवर

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी

Honeybee Attack: वेरूळ लेणीमध्ये मधमाशांचा हल्ला; १०० पर्यटक जखमी, एकाची प्रकृती गंभीर

छत्रपती सांभाजीनगर : वेरूळ लेणी परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. सुट्ट्या असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक

Pune : चिमुरडीच्या आरोपीची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार; नवले पुलावरील आंदोलन थांबले, वाहतूक पुन्हा सुरू

पुणे : नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. आरोपीला फाशीला शिक्षा

नसरापूरच्या ग्रामस्थांचे पुणे- सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन; बालिकेवर अत्याचार-खून प्रकरणाचे संतप्त पडसाद

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना

Pune Nasarapur Crime : आधी पुतणीवर अतिप्रसंग, मग महिलेवर अत्याचार अन् आता 4 वर्षाच्या चिमुकलीचा बळी; भोरमधील नराधमाचा काळा इतिहास उघड!

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली

Bacchu Kadu : टीका करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही; अंगावर ३०० गुन्हे पण... नागपुरात बच्चू कडूंचा घणाघात

नागपूर : "इतर पक्षांनी आणि मोठ्या नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले, आघाड्या केल्या तेव्हा कुणी काही बोलले नाही, पण