Monday, January 12, 2026

सर आली धावून, रस्ता गेला वाहून!

सर आली धावून, रस्ता गेला वाहून!

मोरे गावाचा संपर्क तुटला; ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थ संतप्त

मुरुड : मुरुड तालुक्यातील मोरे गावाला जोडणारा पर्यायी रस्ता जोरदार पावसात वाहून गेला असून संपूर्ण गावाचा संपर्क तुटला आहे. वेळेत काम पूर्ण न करणा-या संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत येथील ग्रामस्थांनी तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची व ठेकेदारावर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मोरे गावातील जूना पूल मोडकळीस आल्याने याठिकाणी सन २०२४ मधे भूमी पूजन होऊन फेब्रुवारी २०२५ सदरील पुलाच्या कामाला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने मोरे गावात थैमान घातले असून, ड्रेनेजची व्यवस्था नसलेल्या पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहत जाऊन रस्ता खचला. ग्रामस्थांनी वेळोवेळी ठेकेदाराला पाईप टाकण्याची विनंती केली होती, पण दुर्लक्ष झाल्याने आज संपूर्ण गावाचे जनजीवन ठप्प झाले आहे.

गावात लग्नसराई सुरू असताना संपर्क तुटल्याने ग्रामस्थ हैराण झालेत. गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ आणि बांधकाम अभियंता घटनास्थळी पोहोचले, पण समर्पक उत्तरं देऊ शकले नाहीत, यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी उसळली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे मुरुड तालुका उपाध्यक्ष मनीष माळी यांनीही ठेकेदाराच्या गलथान कारभारावर सडकून टीका करत, “सदर ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी पूलाचे काम करणे गरजेचे होते, या पुलाच्या कामात संभाव्य पावसाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन पर्यायी रस्ता बांधण्याची गरज होती. पावसाळ्याचा अंदाज असूनही योग्य व्यवस्था केली नाही. या हलगर्जीपणाचा फटका अखेर गावालाच बसतोय,” असे सांगितले.

तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, बांधकाम अभियंता यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, ग्रामस्थांच्या समस्या जाणून न घेता व समर्पक उत्तरे न दिल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.९ तारखेपर्यंत गावात लग्न सराई असल्याने, प्रशासनाने या कामात दुर्लक्ष केल्याने गावाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.

शासनाच्या संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घालून तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.माजी सरपंच रमेश दिवेकर, ग्रामस्थ उद्देश कासारे यांनी आपला संताप व्यक्त केला.

मोरे गाव अध्यक्ष जगदीश पाके,भाऊ दिवेकर,अनंत घाग, कैलास दिवेकर, नरेश दिवेकर, गणेश दिवेकर, राहुल दिवेकर, कृष्णा घोसाळकर, मनीष दिवेकर,निलिशा दिवेकर, माधुरी दिवेकर, शुभांगी पाटील, मनीषा दिवेकर, रुपाली दिवेकर यांसह ग्रामस्थ व महिला संख्येने उपस्थित होत्या. मोरे गावाला जोडणा-या नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला न झाल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा