मुंबई : मुंबईत शनिवार १ फेब्रुवारी २०२५ पासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा महाग झाली आहे. आधी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (Mumbai Metropolitan Region) अर्थात एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २३ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे २८ होते. आता एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २६ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे ३१ रुपये झाले आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात कूल कॅबचे किमान भाडे आता ४८ रुपये झाले आहे. आधी कूल कॅबचे किमान भाडे ४० रुपये होते. कूल कॅबच्या किमान भाड्यात आठ रुपयांची वाढ झाली आहे.
किमान भाडे हे पहिल्या दीड किमी अंतरासाठी लागू होते. किमान अंतरापुढील प्रत्येक किमी. साठी रिक्षाचे किमान भाडे आधी १५.३३ रुपये होते ते आता १७.१४ रुपये झाले आहे. तसेच किमान अंतरापुढील प्रत्येक किमी. साठी टॅक्सीचे किमान भाडे आधी १८.६६ रुपये होते ते आता २०.६६ रुपये झाले आहे. याच पद्धतीने किमान अंतरापुढील प्रत्येक किमी. साठी कूल कॅबचे किमान भाडे आधी २६.७१ रुपये होते ते आता ३७.२० रुपये झाले आहे.
मीटर रिकॅलिब्रेट केल्यानंतर नवा दर संबंधित रिक्षा, टॅक्सी, कूल कॅबला लागू होणार आहे. जोपर्यंत मीटर रिकॅलिब्रेट होत नाही तोपर्यंत जुन्या दराने संबंधित रिक्षा, टॅक्सी, कूल कॅब सेवा उपलब्ध असेल. सध्या मुंबईत सुमारे तीन लाख रिक्षा आणि १५ हजार टॅक्सी आहेत. यामुळे सर्व रिक्षांसाठी मीटर रिकॅलिब्रेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.