मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. ही योजना विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरली. अशातच आता या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी तब्बल चार हजार लाडक्या बहिणींनी हे फॉर्म परत घेतले आहेत. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेतून काढता पाय घ्यावा लागला आहे.
विधानसभेत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेची निवडणुकीआधीच सुरुवात झाली होती. मात्र त्या वेळेस योग्यरित्या अर्जाची छाननी न केल्याने अपात्र महिलांनाही या योजनेचा लाभ घेता आला आहे. त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला. महिलांनी महायुतीला भरभरुन मतदान केलं. त्यानंतर आता महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं सगळ्या अर्जांची पुन्हा छाननी सुरु केली आहे.
निकषात बसत नसतानाही अर्ज करणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिला अर्ज पडताळणीत अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अपात्र ठरल्यास आतापर्यंत मिळालेली लाभाची रक्कम दंडासह वसूल करण्यात येईल, अशी भीती अनेक महिलांना वाटते. त्यामुळेच त्यांनी अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे. अर्ज मागे घेणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत ४ हजार महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत.
अदिती तटकरे काय म्हणाल्या ??
महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या ‘योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले पैसे परत घेण्याचा आमचा विचार नाही. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरलेल्या महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्या महिला अपात्र ठरतील. त्यांना पुढील हफ्ते मिळणार नाहीत. अन्य लाभार्थ्यांना जानेवारीच्या अखेरीस पुढील हफ्ता मिळेल,’