अमरावती : अमरावतीचा धडाकेबाज यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माला २०२५(IPL 2025) मध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट मोसमासाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) ११ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. त्यामुळे अमरावतीच्या क्रिकेट वर्तुळात आनंदाची लाट पसरली असून, यामुळे इतर उदयोन्मुख क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळाल्याशिवाय राहणार नाही.
जितेश शर्मा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या संघात होता. त्याचप्रमाणे त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह घरगुती क्रिकेटमध्येही आक्रमक फटकेबाजी केली आहे. सोबतच यष्टिरक्षक म्हणूनही त्याची कामगिरी ही देखणी राहिली आहे. त्याने घेतलेले झेल हे उत्तम ठरले आहेत.
याआधी तीन आयपीएल मोसमांमध्ये पंजाब किंगने त्याला २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. परंतु, त्याची आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय क्रिकेटमधील उत्तम कामगिरी बघता त्याला अचानक ११ कोटी रुपये भाव मिळाला आहे. याआधी अन्य कोणत्याही अमरावतीकर क्रिकेटपटूला अशाप्रकारे आयपीएलमध्ये भाव मिळाला नव्हता, हे विशेष.