स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात आज ७८ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिंदे सरकारकडून राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीम राबवली जात आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केल्यानंतर देशवासियांना संबोधित केले. या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. तसेच मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली.
भारतातील अनके विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात जातात. अशावेळी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या पार्श्वभूमीवर मागील दहा वर्षांत सरकारने वैद्यकीय क्षेत्रात १ लाख जागा वाढवल्या होत्या. त्यानंतर आता आणखी जागा वाढवण्यात येतील असे सरकारने निश्चित केले आहे. येत्या पाच वर्षांत वैद्यकीय शिक्षणातील ७५ हजार जागा वाढवण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
त्याचबरोबर विकसित भारत २०४७ मध्ये ‘स्वस्थ भारत’ही व्हायला हवा. या स्वस्थ भारतासाठी मुलांच्या पोषणावर आजपासूनच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे विकसित भारताची पहिली पिढी आहे, त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन पोषणबाबत सरकारने एक अभियान चालवले आहे. त्यासाठी आम्ही ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ सुरु केले आहे, असेही मोदींनी यावेळी म्हटले.