Wednesday, June 10, 2026

POK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणावाचा भडका; भीषण हिंसाचार, आंदोलने आणि नेमकी परिस्थिती काय?

POK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणावाचा भडका; भीषण हिंसाचार, आंदोलने आणि नेमकी परिस्थिती काय?

Mumbai : पाकव्याप्त काश्मीर (PoK) सध्या एका भीषण अशांततेच्या काळातून जात आहे. रावळकोटसह अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये उफाळलेल्या हिंसक आंदोलनांनी संपूर्ण प्रदेशात तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. वाढती महागाई, स्थानिक प्रशासनातील ढवळाढवळ आणि राजकीय हक्कांच्या मुद्द्यांवरून पेटलेल्या या संघर्षात आतापर्यंत किमान ३० जणांचा बळी गेला असून, २०० हून अधिक नागरिक आणि सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत.

संघर्षाची ठिणगी: नेमके काय घडले?

या हिंसाचाराची सुरुवात रावळकोट येथील एका घटनेने झाली. ‘जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी’ (JAAC) च्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला होता. हा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने केलेल्या लाठीचार्जमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हिंसाचार उफाळला. जमावाकडून बंदुकीचा वापर आणि पेट्रोल बॉम्ब फेकल्याचे दावे सुरक्षा दलाने केले आहेत, तर दुसरीकडे सुरक्षा दलाने गोळीबार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आंदोलनाचे मूळ कारण: न्यायालयीन निकाल आणि राजकीय संघर्ष

या अस्थिरतेमागे केवळ तात्कालिक कारणे नाहीत, तर दीर्घकाळापासून खदखदणारा असंतोष आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पाकव्याप्त काश्मीर विधानसभेतील ४५ पैकी १२ जागा, ज्या पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या काश्मीरी शरणार्थींसाठी राखीव आहेत.

  • JAAC ची मागणी: या १२ जागा कायमस्वरूपी रद्द (विसर्जित) कराव्यात, कारण या जागांवर पाकिस्तान सरकारकडून उमेदवार उभे केले जातात, जेथील प्रशासनात ढवळाढवळ करतात.

  • सर्वोच्च न्यायालयाचा निकाल: PoK च्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, या जागा रद्द करण्यासाठी घटना दुरूस्ती आवश्यक आहे. या निकालानंतर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • २७ जुलैची निवडणूक: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे.

JAAC ही PoK मधील सामाजिक, व्यापारी आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची एक प्रभावशाली संघटना आहे. वाढती महागाई, अन्नधान्याचे दर आणि विजेच्या वाढलेल्या किमतींविरोधात ही संघटना सातत्याने आवाज उठवत आली आहे. पाकिस्तान सरकारसाठी ही संघटना एक मोठी डोकेदुखी ठरली असून, दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत यावर बंदीही घालण्यात आली आहे.

अवामी ॲक्शन कमिटी’ (JAAC) कोण आहे?

सद्यस्थिती आणि मानवी संकट

मुझफ्फराबाद, गिलगिट-बाल्टिस्तान, रावळकोट, मिरपूर आणि भिंबर यांसह अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने:

  • जमावबंदी लागू केली आहे.

  • इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केली आहे.

  • दळणवळणाची साधने ठप्प केल्याने स्थानिक नागरिक अक्षरशः अडकून पडले असून, त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे.

भारताची भूमिका

या घडामोडींवर भारताने कडक प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आपल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान खोट्या बातम्या पसरवत आहे. PoK मध्ये होत असलेला मानवाधिकार उल्लंघन आणि पोलिसांचा अत्याचार ही चिंतेची बाब असून, आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाकिस्तानला जाब विचारला पाहिजे, अशी भूमिका भारताने मांडली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >