भीषण अपघातात वेगवान कारने दिली ६ गाड्यांना धडक; तिघांचा मृत्यू तर ९ जण जखमी
मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सीलिंकवर काल रात्री १० च्या सुमारास एक भीषण अपघात (Bandra-Worli sea link accident) घडला. टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत.
इनोव्हा (Innova) या वेगवान गाडीने टोल प्लाझावर १०० मीटर अंतरावर गाड्यांना धडक दिली. सी लिंकवरील मर्सिडीज (Mercedes) गाडीला डॅश मारल्यानंतर या गाडीने वेग वाढवला आणि लवकर निघून जाण्याच्या घाईत आणखी काही गाड्यांना धडक मारली. इनोव्हा गाडीत ड्रायव्हरसह सात लोक बसले होते. सध्या ड्रायव्हर जखमी असून त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचार झाल्यावर त्याची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, वरळी सी लिंकवरील अपघातावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले भाजपा नेता जितेंद्र चौधरी (Jitendra Choudhary) यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी या कार चालकाने सी लिंकवर आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता असा दावा केला आहे. एका कार्यक्रमातून परतत असताना सी लिंकवर मागून आलेल्या कारने आपल्या कारला टक्कर मारली होती. मी ज्या बाजूला बसलो होतो त्याच बाजूला कारने टक्कर मारली. परंतु, आपली कार समुद्रात पडण्यापासून वाचली, असा दावा त्यांनी केला.
यानंतर ही कार त्याच वेगाने टोल नाक्याच्या दिशेने गेली. टोल नाक्यावर गाड्या उभ्या असतील याचा त्याला अंदाज नसावा. यामुळे त्याने तेथील गाड्यांना टक्कर मारली. तो ड्रायव्हर पाकिस्तानी भाषेत बोलत होता, असा दावा चौधरी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे या घटनेला नेमकं काय वळण मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.