Thursday, June 4, 2026

BDD Chawl : बीडीडी चाळीचा ऐतिहासिक कायापालट! १६० चौरस फुटांच्या खोलीतून थेट ५०० चौरस फुटांच्या आलिशान घरात; 'या' दिवसापासून ताबा वाटप सुरू

BDD Chawl : बीडीडी चाळीचा ऐतिहासिक कायापालट! १६० चौरस फुटांच्या खोलीतून थेट ५०० चौरस फुटांच्या आलिशान घरात; 'या' दिवसापासून ताबा वाटप सुरू

मुंबई : अनेक दशकांपासून बीडीडी चाळीतील (BDD Chawl) छोट्याशा खोल्यांमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांचे मोठ्या आणि आधुनिक घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पूर्ण झालेल्या पहिल्या टप्प्यातील इमारतींमधील ५३७ सदनिकांचे वितरण ५ जूनपासून सुरू होणार आहे. म्हाडा प्रशासनाकडून पात्र रहिवाशांना अधिकृत ताबा पत्र देण्यात येणार असून लवकरच अनेक कुटुंबे नव्या घरात गृहप्रवेश करणार आहेत.

हा प्रकल्प मुंबईतील सर्वात महत्त्वाकांक्षी पुनर्विकास योजनांपैकी एक मानला जातो. अनेक पिढ्यांपासून अवघ्या १६० चौरस फुटांच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आता तब्बल ५०० चौरस फुटांचे प्रशस्त आणि आधुनिक फ्लॅट विनामूल्य मिळणार आहेत. त्यामुळे बीडीडी चाळीतील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (BDD Chawl)

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’मध्ये अत्याधुनिक सुविधा :

पुनर्विकसित प्रकल्पाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ असे नाव देण्यात आले आहे. नव्या इमारतींमध्ये आधुनिक जीवनशैलीला अनुरूप सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घरांमध्ये उच्च दर्जाच्या फरशा, ग्रॅनाईट किचन ओटा, ॲल्युमिनियमच्या खिडक्या, आकर्षक अंतर्गत रचना तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक इमारतीत अत्याधुनिक सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, दोन प्रवासी लिफ्ट, प्रशस्त लॉबी आणि वाहनांसाठी तीन मजली तळघर पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या चाळ संस्कृतीतून आधुनिक गृहनिर्माण संकुलाकडे मोठी झेप घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. (BDD Chawl)

घराचा ताबा मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

नवीन घराचा ताबा स्वीकारण्यासाठी लाभार्थ्यांना पुनर्वसन करारनामा, शासकीय ओळखपत्रांच्या प्रती, संक्रमण शिबिराशी संबंधित हमीपत्र आणि कुटुंबाचे अद्ययावत छायाचित्र सादर करावे लागणार आहे. या सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर रहिवाशांना अधिकृत ताबा पत्र देण्यात येईल. (BDD Chawl)

२० उंच इमारतींची उभारणी; १२ वर्षे देखभालीची जबाबदारी म्हाडाकडे :

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २३ मजल्यांच्या एकूण २० पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हजारो कुटुंबांना आधुनिक आणि सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. (BDD Chawl)

विशेष म्हणजे, या इमारतींमधील सामाजिक सुविधा, सार्वजनिक जागा आणि इतर देखभालीची जबाबदारी पुढील १२ वर्षे म्हाडाकडे राहणार आहे. त्यामुळे नव्या घरांमध्ये स्थलांतर करणाऱ्या रहिवाशांना देखभालीचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. मुंबईच्या गृहनिर्माण इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील हजारो कुटुंबांच्या जीवनमानात मोठा बदल घडून येणार आहे. (BDD Chawl)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >