नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीबाबत (Unemployment) एक अहवाल समोर आला असून तो अत्यंत चिंताजनक आहे. या अहवालानुसार, देशातील सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.
अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या (Azim Premji University) वतीने जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, देशातील २५ वर्षांखालील तरुण पदवीधरांपैकी ४२.३ टक्के बेरोजगार आहेत. देशातील बेरोजगारीचा दर (Unemployment Rate) २०१९-२० मध्ये ८.८ टक्के होता, जो २०२०-२१ मध्ये ७.५ टक्के आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६.६ टक्क्यांवर आला आहे.
अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या स्टेट ऑफ वर्किंग इंडिया २०२३च्या अहवालानुसार, सर्वाधिक २२.८ टक्के बेरोजगारी दर २५ ते २९ वयोगटातील तरुणांमध्ये आहे.
उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेतलेल्या २५ वर्षांखालील तरुणांमधील बेरोजगारीचा दर २१.४ टक्के आहे, जो सर्वाधिक आहे.
३५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर ४० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पदवीधर लोकांमध्ये बेरोजगारीचा दर केवळ १.६ टक्के आहे.
अहवालानुसार, २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या निरक्षर तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १३.५ टक्के असल्याचे आढळून आले आहे. तर ४० वर्ष आणि त्यावरील निरक्षर गटातील बेरोजगारीचा दर २.४ टक्के आहे.
अझीम प्रेमजी विद्यापीठाचा हा अहवाल सरकारी आकडेवारीवर आधारित आहे. एनएसओचे रोजगार-बेरोजगार सर्वेक्षण, श्रमिक कार्यबल सर्वेक्षण, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण, लोकसंख्या जनगणना यासारख्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. इंडिया वर्किंग सर्व्हे नावाचे विशेष सर्वेक्षण कर्नाटक आणि राजस्थानच्या ग्रामीण भागातही करण्यात आले आहे.
अहवालात म्हटले आहे की, देशातील बेरोजगारीचा दर कमी झाला असला तरी उत्पन्नाची पातळी स्थिर राहिली आहे. अहवालानुसार, कोरोना महामारीचा तडाखा बसण्यापूर्वीच महिलांच्या उत्पन्नात घट होऊ लागली होती. २००४ पासून, महिला रोजगार दर एक तर घसरत आहे किंवा स्थिर आहे. २०१९ पासून महिलांच्या रोजगारात वाढ झाली आहे. महामारीच्या काळात मोठ्या संख्येने महिलांनी स्वयंरोजगाराचा अवलंब केला आहे. कोरोना महामारीपूर्वी ५० टक्के स्त्रिया स्वयंरोजगार करत होत्या आणि महामारीनंतर हा आकडा ६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.