काय निर्णय होणार?
जालना : जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या (Jalana Maratha Andolan) प्रश्नावर काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळातून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे या चर्चेला यश मिळाले नाही. यास्तव उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि उदयनराजे भोसले यांचे शिष्टमंडळ जाणार आहे. दुपारी १२:३० वाजता हे मंडळ गावात दाखल होईल, अशी माहिती मिळत आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati village) येथे गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या आंदोलनाचा प्रश्न फारच चिघळला आहे. काल राज्य सरकारने न्यायालयात टिकेल असं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं. मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यामुळे ठिकठिकाणी मराठा आंदोलक आणखी आक्रमक झाले आहेत. तर आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कालच्या निर्णयानंतर पाणीही न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारला यावर लवकरात लवकर निर्णय घेणे भाग पडणार आहे. त्यामुळे आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणार्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केला. या घटनेचे राज्यभरात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे तर सरकार मात्र अडचणीत सापडले आहे. ठिकठिकाणी आंदोलन आणि बंद पाळण्यात येत आहे. आज देखील कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात बंदची हाक दिली गेली आहे. ठिकठिकाणी होणारे रस्ता रोको आणि एसटी बसची तोडफोड लक्षात घेता मराठवाड्यात येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळातर्फे आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. त्यामुळे यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra