आशिष शेलार यांचा घणाघात
मुंबई : महाराष्ट्रात येऊ शकणारे प्रकल्प गुजरातला पाठवले आणि महाराष्ट्राची प्रगती खुंटवली अशी आरड लावणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गंभीर आरोप केला आहे. गेली सहा वर्षे उद्धव ठाकरे नाणार येथे बारसू रिफायनरीच्या प्रकल्पाला (Barsu refinery Project) विरोध करत आहेत. तर दुसरीकडे कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. उद्धव ठाकरे यांनी नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली का? असा खडा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
आशिष शेलार म्हणाले, कोकणातील नाणार प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्को या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. एका वर्तमानपत्रात १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी आली आहे.
गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले. प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या ना? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? अस प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra