Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखनवा अर्थसंकल्प मोदी सरकारच मांडणार

नवा अर्थसंकल्प मोदी सरकारच मांडणार

केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेरची बैठक रविवारी पार पडली. येत्या काही दिवसांत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास कशाप्रकारे गतिमान झाला आणि २०२४च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठीचे मतदान तर सोडाच; परंतु निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच आपणच सत्तेवर येणार आणि ‘अब की बार, चार सौ पार’ हा नारा देशाचे पंतप्रधान मोदी आत्मविश्वासाने देतात, याचे उत्तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीवर नजर दिल्यास सहजगत्या प्राप्त होते. ज्या ज्या वेळी लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेरची बैठक होते, त्या त्या वेळी त्या बैठकीवर निवडणुकांचे सावट स्पष्टपणे पाहावयास मिळते. या बैठकांमध्ये निवडणुकांचीच चर्चा होत असते, पण ही बैठक या सर्व आजवरच्या बैठकांना अपवाद ठरली. या बैठकीवर कोणत्याही प्रकारचे राजकीय सावट नव्हते. निवडणुकीची कोणतीही चर्चा झाली नाही. अखेरच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुका झाल्यावर पुढच्या १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांचा विकास आराखडा मांडण्यात आला.

केंद्रीय मंत्रिमंडळाने रविवारी १०० दिवसांच्या कृती आराखड्यावर चर्चा केली. कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे व कोणत्या समस्या तातडीने सोडवायच्या यावर विचारमंथन करण्यात आले. बैठकीचा समारोप करताना पंतप्रधान मोदींनी सभागृहात पुन्हा येणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करताना मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व पुन्हा लवकर सभागृहात भेटू, असे सांगितले. निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर होऊ द्या, मतदान कधीही होऊ द्या. देशामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेवर भाजपा व मित्र पक्षाचेच सरकार येणार असल्याचा दावाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी करताना आपल्या सहकाऱ्यांना उत्साहित केले. येणारा नवा अर्थसंकल्पही मोदी सरकारच मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या दिवसभराच्या बैठकीत विकसित भारत २०४७ साठी व्हिजन डॉक्युमेंट आणि पुढील पाच वर्षांचा तपशीलवार कृती आराखडा यावर सचिवांनी सादरीकरण केले.

या सादरीकरणांमध्ये, विकसित भारतासाठी पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाची रूपरेषा मांडण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळातील केवळ सहकाऱ्यांनाच मार्गदर्शन केले नाही, तर सरकारी अधिकाऱ्यांनाही निवडणूक कालावधीमध्ये कामांमध्ये सातत्य ठेवा, निवडणूक कालावधीला सुट्टी समजून आराम करू नका. देशाच्या विकासकामांमध्ये खंड पडता कामा नये. सरकारी प्रकल्प आणि योजनांवर त्यांचे काम सुरू ठेवा, अशा शब्दांमध्ये मोदी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचवेळी निवडणुकीनंतर परत आल्यावर सरकार नव्या जोमाने आणि उत्साहाने काम करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान सांगितले.

विकसित भारताचा रोडमॅप हा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या सखोल तयारीचा परिणाम आहे. यात सर्व मंत्रालयांचा समावेश असलेला संपूर्ण सरकारी दृष्टिकोन आणि राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था, नागरी समाज, वैज्ञानिक संस्था आणि त्यांच्या कल्पना, सूचना आणि इनपुट्स शोधण्यासाठी तरुणांची जमवाजमव यांचा समावेश होता. विविध स्तरांवर २७०० हून अधिक बैठका, कार्यशाळा आणि चर्चासत्रे झाली. २० लाखांहून अधिक तरुणांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. रोडमॅपमध्ये स्पष्टपणे व्यक्त केलेल्या राष्ट्रीय दृष्टी, आकांक्षा, उद्दिष्टे आणि कृती बिंदूंसह सर्वसमावेशक ब्लू प्रिंट आहे. उद्दिष्टांमध्ये आर्थिक वाढ, शाश्वत विकास उद्दिष्टे, राहणीमान सुलभता, व्यवसाय करण्यास सुलभता, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण यांचा समावेश आहे. मेमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्वरित अंमलबजावणीसाठी १०० दिवसांच्या अजेंडावरही तत्काळ पावले उचलण्यासाठीचीही भूमिका पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत मांडली.

देशातील विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना निवडणुका संपल्यावर सत्ता संपादन करताच पुढील १०० दिवसांमध्ये काय कार्यक्रम करायचे याचा आराखडाच पंतप्रधान मोदी यांनी बनवून ठेवला आहे. विरोधी पक्षाकडे भाजपाविरोध हाच एककलमी कार्यक्रम आहे. सरकार कुठे चुकले आहे आणि आम्ही काय करू शकतो याचे कोणतेही स्पष्टीकरण विरोधी पक्ष जनतेला देत नाही व देऊही शकणार नाही.

२०१४ नंतर जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला एक नवीन ओळख प्राप्त झालेली आहे, तीच ओळख आज टिकविण्याची गरज आहे. रेल्वे, रस्ते या पायाभूत सुविधांना मोदी सरकारने मागील १० वर्षांत प्राधान्य दिल्याने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आज देशामध्ये दळणवळणासाठी कुठेही अडचण राहिलेली नाही, भूतलावरील नंदनवन असलेल्या व एकेकाळी अतिरेक्यांच्या विळख्यात, दहशतवाद्यांच्या भीतीमध्ये वावरणाऱ्या जम्मू-काश्मीरचा चेहरा-मोहरा बदलला आहे. तेथेही पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे. देशाची रेल्वे आज बुलेट ट्रेनच्या दिशेने वाटचाल करत आहे. रामजन्मभूमीमध्ये रामलल्लाही विराजमान झाले आहेत. लवकरच समुद्रतळाशी जाऊन मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाचेही भारतवासीयांना दर्शन होणार आहे.

अवघ्या दोन – पावणेदोन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्ष जय्यत तयारी करत असताना सत्ताधारी भाजपा देशाच्या विकासकामांच्या नियोजनामध्ये व्यस्त असल्याचे सुखावह चित्र रविवारच्या बैठकीदरम्यान आम्हा भारतवासीयांना जवळून पाहावयास मिळाले आहे. निवडणुका कधीही होऊ द्या, आम्हीच सत्तेवर येणार असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यकर्त्यांमध्येनिर्माण केलेला आहे. देशातील जनता पुन्हा भाजपालाच सत्ता सोपविणार याची पंतप्रधान मोदी यांना खात्री आहे.

मोदी राजवटीत गेल्या १० वर्षांमध्ये देशात शांतता नांदू लागली आहे. अतिरेकी कारवाया व दहशतवादी घडामोडींना जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. देशाला विकास पथावर नेताना, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करताना, अर्थकारणाला गती देताना मोदींनी जनसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० वर्षांमध्ये सत्तेचा जनकल्याणासाठी वापर केल्यामुळेच ‘अब की बार चार सौ पार’ असे आत्मविश्वासाने बोलत असावेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -