नवी दिल्ली: देशातल्या 6071 रेल्वे स्थानकांवर आत्तापर्यंत वाय-फाय सेवा पुरविण्यात आली आहे. रेल्वे स्थानकामध्ये येणा-या प्रवाशांना त्यादिवशी पहिल्या अर्धा तासासाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतरच्या काळासाठी मात्र वाय-फाय वापरासाठी शुल्क आकारले जाणार आहे.
रेल्वे स्थानकावर वाय-फाय उपलब्ध असेल तर प्रवाशांना इंटरनेटचा वापर करणे सुकर होते. यामुळे जनतेला ऑनलाइन सेवा तसेच माहिती घेण्यास मदत होते. त्याचबरोबरच यामुळे सरकारच्या डिजिटल भारत उपक्रमाला हातभार लागत आहे. या रेल्वेस्थानकांवर दरमहा अंदाजे एकूण 97.25 टेराबाइटस् इतका डेटा वापरला जात आहे.
या योजनेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आलेला नाही. तर दूरसंचार विभागाकडून ‘युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड’ (यूएसओएफ) अंतर्गत ग्रामीण भागातल्या 193 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा पुरविण्यासाठी 27.22 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मेसर्स रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (आरसीआयएल)च्या वतीने देशातल्या 1287 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा पुरविण्यात येत आहे. (यापैकी बहुतांश रेल्वे स्थानके ए-1 आणि ए श्रेणीतील आहेत) उर्वरित स्थानकांमध्ये विविध कंपन्यांनी सीएसआर म्हणजे सामाजिक दायित्व म्हणून आपल्या खर्चाने वाय-फाय सेवा प्रदान केली आहे. यासाठी रेल्वेला कोणत्याही प्रकारचा भांडवली खर्च करावा लागलेला नाही.