मुंबई : राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केलाय. काल उद्धव ठाकरेंनी ज्या बीकेसी मैदानात सभा घेतली त्या मैदानात हनुमान चालिसा वाचून शुद्धीकरण करणार असे नवनीत राणा म्हणाल्या दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही औरंजेबसेना झालीय अशा शब्दात राणांनी टीकास्त्र टाकले आहे.
सध्या सोनिया गांधींचे निवासस्थान म्हणजेच १० जनपथ हीच शिवसेनेची मातोश्री झालीय अशा शब्दात राणांनी टोला हाणला आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर देखील टीका केली होती. राज ठाकरेंच्या वतीने देखील राणांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
नवनीत राणा यांनी पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांची कालची सभा लाचार होती. त्यांनी त्यांच्याच वक्तव्यावरून पलटी घेतली. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काहीही बोलले नाहीत. रोजगाराबाबत कोणतीही घोषणा केली नाही.’ हनुमान चालीसा पठण करणारे सध्या गायब झाले आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करावी, असे मुख्यमंत्र्याची मुंबईतील भाषणात बोलल्याचे सांगत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.
मुख्यमंत्री हनुमान चालीसेचा विरोध करतात, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्याची लाचारी स्पष्ट दिसतेय. गदा हाती न घेता मुख्यमंत्र्यीनी हनुमानाचा अपमान केला आहे, असेही नवनीत राणा यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.