मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा कारभाराबाबत असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय वक्तव्य करणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात कारवाईचा बडगा आयोगाकडून उगारण्यात आला आहे. आयोगाच्या कार्यशैलीबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल असा इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवल्या जात असलेल्या भरती प्रक्रियांबाबत अनेकदा प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे आणि सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांकडून चुकीच्या भाषेचा वापर करण्यात येत असल्याचे असे आयोगाचे म्हणणे आहे. अशा भाषेमुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला बाधा येत असून अशा उमेदवारांविरूद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
तसेच आयोगाच्या स्वतःच्या अधिकारांचा वापर करून अशा उमेदवारांना परीक्षा देण्यापासून देखील वंचित ठेवण्यात येईल असं आयोगाने एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी देखील आयोगाने असभ्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना कारवाईचा इशारा दिला होता.