Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखदेवस्थानांचा विकास

देवस्थानांचा विकास

भाजप हा सुरुवातीपासून हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जात आहे. भाजपची ही प्रतिमा केवळ देशातच नाही तर जगभरातही परिचित आहे आणि भाजपनेही आपली हिंदुत्ववादी प्रतिमा कधीही लपविण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी भाजपने बाबरी रामजन्मभूमीच्या जागेवरील बाबरी मस्जीदच्या अतिक्रमणाविरोधात भाजपनेच सातत्याने भूमिका घेतलेली आहे. त्यासाठी कारसेवाही काढलेली आहे. देशातील सर्वांधिक संख्येने असलेल्या हिंदूंचीच भाजपने पाठराखण केलेली आहे; परंतु आपला हिंदुत्ववाद जोपासताना अन्य धर्मियांवर विशेषत: अल्पसंख्याकांवर अन्याय होणार नाही, याचीही सातत्याने काळजी घेतलेली आहे. भाजप हिंदुत्ववादी विचारधारेची संघटना असली तरी या पक्षसंघटनेत विविध जातीधर्मांचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार, खासदार आहेत, निर्णय प्रक्रियेतील घटक आहेत, हेही यानिमित्ताने आपणास विसरून चालणार नाही. गोपीनाथ मुंडेंचा परिवार, गोपीचंद पडळकर, राम कदम असे तळागाळात विविध जातीचे घटक भाजपमध्ये आहेत. भाजपने धर्मांला जोपासताना देवालाही प्राधान्य दिले आहे. भाजपचा देवधर्म केवळ अयोध्येतील रामापुरताच सीमित न राहता विविध राज्यांतील देवस्थानापर्यंत जाऊन पोहोचला आहे. अर्थात आपला महाराष्ट्रही त्याला अपवाद राहिलेला नाही.

जगद्गुरू तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊलींपासून विविध संतांची कर्मभूमी राहिलेली आहे. विविध देवदेवतांच्या वास्तव्यांनी व पदस्पर्शाने महाराष्ट्राची भूमी पावन झालेली आहे. प्रभू रामचंद्रानाही महाराष्ट्राच्या भूमीवरून जाण्याचा मोह आवरता आलेला नाही.महाराष्ट्रातील वारकरी आणि माळकरी यांच्यासाठी विठुमाऊली हे सर्वोच्च देवस्थान. विघ्नहर्त्या गणरायापाठोपाठ मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने महाराष्ट्राच्या भूमीवर पंढरीच्या विठ्ठलाचे नामस्मरण केले जात आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालावधीचा अपवाद वगळता दरवषी महाराष्ट्राच्या भूमीवर लाखोंच्या संख्येने वाऱ्या पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरवर्षी वारीमध्ये भाविकांची संख्या वाढतच चालली आहे. वारीमध्ये तरुणाईचा सहभाग वाढत चालला आहे. भाजपने महाराष्ट्रातील देवस्थानांची नेहमीच काळजी घेतलेली आहे. देवस्थानांना तसेच सभोवतालच्या परिसरात सुविधा निर्माण करणे व येथील समस्या सोडविणे यासाठी भाजपने नेहमीच युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत व आजही करत आहेत. महाराष्ट्राच्या भूमीवर स्वातंत्र्यानंतर देशाचे अनेक पंतप्रधान येऊन गेले आहेत व आजही ये-जा करत आहेत. देशाच्या रणरागिनी असणाऱ्या इंदिरा गांधीदेखील नऊवारी साडी परिधान करून महाराष्ट्रीय जनतेचे मन जिंकून गेल्या; परंतु नरेंद्र मोदींचा अपवाद वगळता महाराष्ट्रातील देवस्थानांची कोणी काळजी घेतली नाही अथवा देवस्थानांना भेटी देऊन हरीनामाच्या गजरातही कोणी सहभागी झाले नाही. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस याप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या देहू भेटीपाठोपाठ गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील देवस्थानाचा विकास करण्याची घोषणा केल्यामुळे या उक्तीची प्रचिती अनुभवायास मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजही महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांशी जवळीक आहे. अर्थात ही जवळीक सहजासहजी निर्माण झालेली नाही. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देहू येथे भेट दिली होती. जगद्गुरू तुकोबा रायांच्या देहूमध्ये भेट देणारे पंतप्रधान मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान ठरले. गतवर्षी १४ जून रोजी पंतप्रधान मोदी यांनी जगद्गुरू तुकोबा महाराज यांच्या जन्मभूमीत मंदिराच्या शिळा व लोर्कापण सोहळ्यास उपस्थित राहिले होते. कोणत्याही देशाचा पंतप्रधान देशातील कोणत्याही परिसराला ज्यावेळी भेट देतो, त्या भेटीअगोदरच काही दिवसांपूर्वीच त्या परिसरात विकासगंगा वाहण्यास सुरुवात झालेली असते. समस्या सोडविण्यास सुरुवात झालेली असते. रस्त्यांची डागडुजी होण्यास सुरुवात होते. तोच प्रकार देहू नगरीत झाला होता. देहू नगरीचा पंतप्रधान भेटीने झालेला कायापालट तेथील स्थानिक रहिवाशांमध्ये आजही चर्चिला जात आहे. पंढरीच्या विठ्ठल माऊलींच्या भेटीला लाखोंच्या संख्येने वारकरी दरवर्षी चालत जातात. हाती टाळ, मुदंग व मुखी विठ्ठल नामाचा जयघोष करत हे वारकरी पंढरीच्या दिशेने चालत असतात. त्यांच्या पायाला कधी वेदना होत नाही अथवा शरीराला कधी यातना जाणवत नाही. वारकरी ज्या रस्त्याने वारी घेऊन जातात, त्या वारी जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था होती. या रस्त्याच्या डागडुजीसाठी कोणीही यापूर्वी गांभीर्याने पाहिले नव्हते, कदाचित त्यांना वारकऱ्यांचे दु:ख कधी जाणवले नव्हते. हीच दुखरी नस नेमकी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ओळखली होती. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी, डागडुजीसाठी शेकडो नव्हे तर हजारो कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केले आणि आज त्या वारी जाणाऱ्या रस्त्याच्या डागडुजीचे व रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने वारकरी आज खऱ्या अर्थांने सुखावला आहे आणि पंतप्रधान मोदी यांना मनोमन धन्यवाद देत आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाटचालीला मार्गदर्शन समजून वाटचाल करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या वाटचालीचे व कार्याचे अनुकरण करत आहेत. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील देवस्थानाच्या विकासाची घोषणा करताना सर्वप्रथम पंढरपूर व मुंबईतील मुंबादेवीला प्राधान्य दिले जाणार असल्याची घोषणा केली. भाजप केवळ राजकारणात मते मिळविण्यासाठी देवाधर्माचा वापर करत नाही, तर देवस्थानाची काळजी करण्याला व देवस्थानाचा विकास जोपासण्यालाही प्राधान्य देतो, हे पंतप्रधान मोदी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वारंवार आपल्या कृतीतूनही दाखवून दिले आहे. मुंबईतील मुंबादेवीच्या दर्शनासाठी केवळ मुंबई शहर आणि उपनगरातीलच नाहीतर जवळच्या नवी मुंबई, ठाणे, पनवेल-उरण, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर येथून विविध भाविक येत असतात. पंढरपुरात तर बाराही महिने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची ओघ विठ्ठल दर्शनासाठी सुरुच असतो. एकाचवेळी पंढरपुर व मुंबादेवी या दोन्ही देवस्थानाच्या विकासाची घोषणा करताना शहरी व ग्रामीण असा समन्वय साधण्याचा नकळतपणे फडणवीस यांनी प्रयत्न केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -