Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडी२१ वर्षांनी भारताने जिंकला 'मिस युनिव्हर्स २०२१'चा खिताब

२१ वर्षांनी भारताने जिंकला ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब

हरनाज संधूने बाजी मारली

इस्रायल : इस्रायलमध्ये पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठित ‘मिस युनिव्हर्स २०२१’ (Miss Universe 2021) या सौंदर्य स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) बाजी मारली. याआधी अभिनेत्री लारा दत्ताने (Lara Datta) २००० मध्ये हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी हरनाजने ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट भारतात आणला.

हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स २०२० अँड्रिया मेझा हिने हरनाजला आपला मुकूट दिला.

या सौंदर्यस्पर्धेत पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिका हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजयी ठरले.

२१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला.

हरनाझच्या विजयाची बातमी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे.

इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात हरनाझला मुकुट घातला गेला तो क्षण त्यांनी शेअर केला आहे. “नवीन मिस युनिव्हर्स आहे… इंडिया,” असं कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आले आहे. क्लिपमध्ये मेक्सिकोची मिस युनिव्हर्स २०२० आंद्रिया मेझा भावनिक झालेल्या हरनाझला मुकुट घालताना दिसत आहे.

चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.

“आजच्या काळात येणाऱ्या तणावांना कसं सामोरं जावं याविषयी तुम्ही तरुण महिलांना काय सल्ला द्याल”, असा प्रश्न टॉप ३ राऊंडमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना हरनाज म्हणाली, “स्वत:वर अतिविश्वास ठेवणं हा आजच्या तरुणाईवरील सर्वांत मोठा दबाव आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात याची जाणीवच तुम्हाला सुंदर बनवते. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोलुयात. तुम्ही समोर या, इतरांशी बोला.. कारण तुमच्या आयुष्याला घडवणारे तुम्हीच आहात. तुम्हीच स्वत:चा आवाज आहात. मला माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच आज मी याठिकाणी उभी आहे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -