Tuesday, May 7, 2024
HomeदेशNarayan Rane : आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेना पाचपेक्षा जास्त जागा जिंकणार...

Narayan Rane : आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेना पाचपेक्षा जास्त जागा जिंकणार नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा

अहमदाबाद : पुढील वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पाचपेक्षा अधिक जागा जिंकणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमीवर अहमदाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे यांनी विविध राजकीय पक्षांचा आधार घेत स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे कधीही अन्य राजकीय नेत्यांच्या कार्यालयात किंवा घरी गेले नव्हते, हे मात्र दारोदारी फिरतात, असे ते म्हणाले.

दरम्यान, मोदी सरकारच्या सेवेला, सुशासनाला आणि गरीब कल्याणाला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जनसंपर्क अभियानांतर्गत अहमदाबादच्या मणिनगर विधानसभा मतदारसंघात मराठी समाज संवाद संमेलनाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात समान नागरी कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील असून केंद्र सरकारने आदिवासी बांधवांसाठी तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लघुउद्योजकांसाठी खूप काही कार्य केले आहे. आमचे सरकार त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देण्यास निश्चितच सक्षम राहील, असेही ते म्हणाले. २०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपासोबत युती केली व जिंकले, मात्र त्यानंतर भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी मिळून महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केले. गतवर्षी जून महिन्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड पुकारले आणि शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोसळले. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज राज्यात भाजपा व एकनाथ शिंदेंचे मजबूत सरकार आहे. आता उद्भव ठाकरेंच्या शिवसेनेत केवळ १३-१४ आमदार शिल्लक आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या आमदारांची संख्या पाचपेक्षा कमी दिसेल, असे ते म्हणाले..

भाजप लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा जिंकून पुन्हा एकदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. २०२४ मध्ये भाजपच्या निवडणूक प्रचारात यूसीसीचा मुद्दा केंद्रस्थानी असेल का, असे विचारले असता राणे म्हणाले की, याबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल. अनेक आदिवासी संघटना यूसीसीच्या अंमलबजावणीच्या विरोधात असल्याने आणि त्यांनी आधीच त्यांच्या चिंता व्यक्त केल्या असल्याने केंद्र सरकार त्यांना या मुद्द्यावर जिंकण्याचा प्रयत्न करेल असे राणे म्हणाले.

आमच्या सरकारने आदिवासींसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. माझ्या एमएसएमई मंत्रालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना मदत करण्यासाठी योजनाही सुरू केल्या होत्या. या प्रश्नावर आम्ही त्यांना पटवून देऊ शकू, असा माझा ठाम विश्वास आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -