Thursday, August 27, 2026

Navnath Ban : MPSC पेपरफुटी प्रकरणावरून नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर निशाणा

Navnath Ban : MPSC पेपरफुटी प्रकरणावरून नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील आरोपी सुनील गाढवे यांच्याशी रोहित पवारांचे नेमके काय संबंध आहेत, याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी रोहित पवार आणि सुनील गाढवे यांची एकत्रित छायाचित्रे पत्रकारांसमोर सादर केली. यामध्ये शरद पवार यांच्यासोबतच्या काही छायाचित्रांचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला. (Navnath Ban)

‘गाढवे रोहित पवारांच्या जवळचे’ असा दावा

सुनील गाढवे हे रोहित पवारांच्या अत्यंत जवळचे असून पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध प्रकरणांमध्ये दोघांनी एकत्र काम केल्याचा दावा बन यांनी केला. पुण्यातील रोहित पवारांची अनेक कामे गाढवे पाहत असल्याचेही त्यांनी म्हटले.

“सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचे संबंध नेमके काय आहेत? त्यांची ओळख किती वर्षांपासून आहे, कोणामार्फत झाली आणि पुण्यात गाढवेंनी रोहित पवारांसाठी कोणती कामे केली? MPSC आंदोलनातील गाढवेंची भूमिका काय होती?” असे प्रश्न उपस्थित करत बन यांनी रोहित पवारांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे सहा आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचेही बन यांनी सांगितले.

सुनील गाढवे हे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे पीए होते, असा आरोप केला जात असल्याचा उल्लेख करत बन यांनी हा दावा फेटाळला. अभिमन्यू पवार यांच्याशी स्वतः चर्चा केली असून, गाढवेंना त्यांनी कधीही पीए म्हणून नियुक्त केले नव्हते, असे बन यांनी स्पष्ट केले. MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या विविध शिष्टमंडळांमध्ये गाढवे सहभागी झाले होते, मात्र ते अभिमन्यू पवारांचे पीए नव्हते, असा दावा त्यांनी केला. (Navnath Ban)

संजय राऊतांवरही नवनाथ बन यांची टीका

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिका दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही बन यांनी प्रतिक्रिया दिली. अमेरिका आणि भारतात विचारस्वातंत्र्य असल्याचे सांगत त्यांनी राऊतांवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारच्या काळातील काही घटनांचा संदर्भ देत बन यांनी “भारतामध्ये विचारस्वातंत्र्य नसते तर संजय राऊत यांना दररोज वक्तव्य करता आले नसते,” असा टोला लगावला. तसेच राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह पाकिस्तानात जाऊन भाषण करावे, अशी टीकाही त्यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >